• Sat. Sep 21st, 2024

कोल्हापुरातील राड्यामुळे १ हजार कोटी पंचगंगेत बुडाले; इंटरनेट बंदमुळे पाहा किती झालं नुकसान

कोल्हापुरातील राड्यामुळे १ हजार कोटी पंचगंगेत बुडाले; इंटरनेट बंदमुळे पाहा किती झालं नुकसान

कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीला रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवली, याचा फार मोठा फटका आर्थिक उलाढालीला बसला. केवळ बँका, पतसंस्थाच नव्हे; तर अनेक दुकानांतील आर्थिक व्यवहारच ठप्प झाले. त्यामुळे दुकान उघडे असूनही व्यवहार मात्र झाले नाहीत. ‘इंटरनेट बंद’चा फटका ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बसल्याने आयटी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.कोल्हापूर शहरातील काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर शहरात दंगल झाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुधवारी सायंकाळनंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. ही सेवा गुरुवारी दिवसभर; तर शुक्रवारी सकाळी दहापर्यंत बंद होती. ४० तासांपेक्षा अधिक काळ इंटरनेट बंद राहिल्याने जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीला मोठा दणका बसला.

Kolhapur Riots : कोल्हापूर दंगल: सरकारचा एक निर्णय आणि जिल्ह्यात कोट्यवधीचा फटका, राड्यानंतर नेमकं काय झालं?
सर्व प्रकारच्या दुकानांत, अगदी भाजीपाला खरेदीसाठीही हल्ली ‘यूपीआय’च्या माध्यमातून व्यवहार केले जातात. इंटरनेट बंद असल्याने या आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्या. जिल्ह्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे वीस हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. इंटरनेट बंद राहिल्याने त्यांचेही काम ठप्प झाले. शाहू सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात दाखले दिले जातात. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आहे. तिथेही कोणत्याही प्रकारचे दाखले निघू शकले नाहीत.

कोल्हापुरातल्या राड्या प्रकरणी ३५० हून अधिक जणांवर FIR, बंदची हाक देणाऱ्या एकाही व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल नाही
१ हजार कोटींचा फटका

कोल्हापुरातील इंटरनेट सेवा ४० तासांहून अधिक काळ बंद असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका उद्योगांना बसला आहे. यामुळे १ हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असा दावा कोल्हापूर चेंबर ऑफ कमर्सने केला आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा ही बुधवारी संध्याकाळी ५ वाजता बंद करण्यात आली. आणि शुक्रवारी ही सेवा पूर्ववत केली गेली.

इंटनेट बंद झाल्यामुळे जवळपास एक हजार कोटींच्या व्यवहारांना फटका बसला. इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय हा अतिशय घाईत घेतला गेला. प्रशासनाने संपूर्ण इंटरनेट सेवा बंद करण्याऐवजी फक्त सोशल मीडिया अॅप्सवर बंदी आणायला हवी होती. याकाळात ४० ते ५० टक्के ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शन्स झाली. इंटरनेट नसल्याने अर्ध्याहून अधिक बाजार ठप्प होता. ई बिल जनरेट होत नव्हते आणि चेक पास होत नव्हते. याचा फटका व्यापाऱ्यांच्या जीएसटी साखळीलाही बसला आहे, असं कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितलं.

आयटी सेक्टरला जवळपास १५ कोटींचा फटका

इंटरनेट बंदमुळे घरून काम करणाऱ्या १५ हजारांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांना रजा घ्यावी लागली. काही कर्मचारी हे सांगली आणि बेळगावला गेल्याने ते काम करू शकले. इंटरनेट बंदचा आयटी सेक्टरला १० ते १५ कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती कोल्हापूर आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितलं. यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक आयटी कर्मचाऱ्यांना शनिवारी काम करण्यास सांगण्यात आलं आहे. शेअर बाजारात उलाढाल करणाऱ्यांनाही लाखोंचा फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed