पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडीतील सोनगानगर येथे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पहिली घटना घडली. रामदुलारी पंचम झारीया (वय १७) ही दहावीत अनुत्तीर्ण झाली. त्यामुळे ती तणावात होती. तिची आई गीता या खासगी काम करतात. शुक्रवारी त्या कामावर गेल्या. सायंकाळी भाऊ घराबाहेर खेळत होता. याचदरम्यान पंख्याला साडी बांधून रामदुलारीने गळफास घेतला. काही वेळाने निकाल विचारण्यासाठी नातेवाईक घरी आले. त्यांना रामदुलारी गळफास घेतलेली दिसली. गीता यांना माहिती देत नातेवाइकांनी फास काढून रामदुलारीला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
दुसरी घटना सक्करदरा पोलिस स्टेशन हद्दीतील बहादुरा येथील शशिकांत सोसायटी येथे उघडकीस आली. चेतना भोजराज भोयर (वय १६) हिला दहावीत ७१ टक्के गुण मिळाले. प्रथम श्रेणीत येऊनही कमी गुण मिळाल्याचा समज तिने करून घेतला. त्यामुळे ती तणावात होती. दुपारी चेतनाने खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. काही वेळाने तिचे वडील भोजराज खोलीत गेले. चेतना गळफास घेतलेली दिसली. फास काढून भोजराज यांनी चेतनाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. चेतनाचे वडील वृत्तपत्र विक्रेते असून, मोठी मुलगी पुण्यातील कंपनीत कार्यरत आहे. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
शवविच्छेदनापूर्वीच होणार होते अंत्यसंस्कार
गळफास काढून नातेवाइकांनी चेतनाला तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॉक्टरांनी चेतनाला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. कायद्याची माहिती नसल्याने चेतनाचा मृतदेह नतोवाइकांनी घरी नेला. शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी चेतनाचे पार्थिव दिघोरी घाट येथे आणण्यात आले. आत्महत्या केलेल्या मुलीचे शवविच्छेदन न करताच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती सक्करदरा पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे गेले. नातेवाइकांची समजूत घातली. त्यानंतर मेडिकलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी चेतनाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले, अशी माहिती सक्करदरा पोलिसांनी दिली.
अवास्तव अपेक्षा कारणीभूत?
पालक, आप्त व आसपासच्या लोकांच्या अवास्तव अपेक्षा अशा घटनांसाठी कारणीभूत ठरतात काय, असा प्रश्न या दोन्ही घटनांनी निर्माण झाला आहे. अनुत्तीर्ण होणे म्हणजे पुढच्या संधी संपल्या असे अजिबात नाही. शिवाय, प्रथम श्रेणीत येऊनही गुण कमी वाटणे, यामागे याच अतिअपेक्षा असाव्यात. अशावेळी पालक तसेच समाजातील नागरिकांनी या विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे, असा मतप्रवाह यानिमित्ताने पुढे आला.
