जेजुरीतील विश्वस्तांचा वाद काय आहे?
मार्तंड देवस्थानवर सात विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील मंगेश अशोक घोणे हे एकटेच जेजुरीचे रहिवासी, तर पोपट सदाशिव खोमणे आणि विश्वास गोविंद पानसे हे पुरंदर तालुक्यातील आहेत. बाकीचे चौघे तालुक्याबाहेरील आहेत, पुणे जिल्ह्यातील आहेत.
स्थानिक वगळून बाहेरचे का?
जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तपदी बाहेरचे लोक नेमले गेले. स्थानिकांना सोडून बाहेर गावच्या प्रतिनिधींनीची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे बाहेरचे विश्वस्थ नेमण्याच्या गोष्टीचा आम्ही सर्व जेजुरीकर ग्रामस्थ निषेध व्यक्त करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ महादेव बबनराव माळवदकर पाटील यांनी सांगितले आहे.
यात्रा, उत्सव गावकऱ्यांनी करायचे आणि विश्वस्त बाहेरचे नेमायचे हा कुठला न्याय आहे? आम्हा गावकऱ्यांना हे मान्य नाही. त्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केले असून ते आता थांबणार नाही, आणि गावातीलच विश्वस्त झाले पाहिजे ही आमची मागणी आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं.
काय आहे वाद?
देवस्थानाच्या ७ विश्वस्तांपैकी ५ ते ६ विश्वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी निगडीत असून ते बाहेरील रहिवासी आहेत. निवडीमध्ये एकच विश्वस्त स्थानिक निवडला असून जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना राजकीय हस्तक्षेप होत डावलले गेले आहे.
ही बाब ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. मागील विश्वस्तांची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ५०० पेक्षा अधिक अर्ज सादर झाले होते. त्यापैकी ८५ अर्ज अपात्र ठरविण्यात आले तर ३५० पेक्षा अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील काळात शहरातील किमान 4 जण निवडावेत, अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. मुलाखतीवेळी जेजुरी गडाला पायऱ्या किती? देवांची भूपाळी-आरती येते का? गाभाऱ्यात मूर्ती किती? जत्रा यात्रा उत्सवांचे महत्त्व काय? देवस्थानाशी निगडित अनेक प्रश्न मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना विचारण्यात आले होते. जेजुरीकर ग्रामस्थांना डावलून पुणे जिल्ह्यातील इतरत्र रहिवासी असलेल्या ५ व्यक्तींना निवडताना कोणते निकष लावले आहेत? मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी; म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. हा जेजुरीवासीयांवर अन्याय आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया जेजुरीकर नागरिक देत आहेत.