सिद्धार्थचे पूर्वी रिक्षा चालवायचे, येरवडा ते वाघोली मार्गावर ते व्यवसाय करायचे. पीएमपीएल च्या बसेस सुरु झाल्यानं प्रवासी मिळणं कठीण झाल्यानं त्यांनी नोकरी करण्याचा प्रयत्न केला, तो पण करोना काळात गेला त्यामुळं सिद्धार्थच्या वडिलांना भाजी विक्री करावी लागली. ते माझ्यासाठी एवढी मेहनत घेत आहेत एवढा संघर्ष करत आहेत, माझ्या भविष्यासाठी तर मला मी सुद्धा काही तरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे, असं वाटल्याचं सिद्धार्थनं सांगितलं. माझी ही नैतिक जबाबदारी पण होती आणि खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला न्याय दिला, असं सिद्धार्थ म्हणाला. त्यानं गेल्या साडेतीन वर्षांपासून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती.
सिद्धार्थचा हा दुसरा प्रयत्न होता. माझे सर्व मित्र देखील आनंदी असून सोबत अभ्यास करणारे इतर मित्र देखील यशस्वी झाल्याचं तो म्हणाला. सिद्धार्थ हा पुण्यातील खराडी भागात वास्तव्यास आहे. त्याच्या तयारीसंदर्भात विचारलं असता अकरावी बारावी पासून यूपीएससी परीक्षा द्यावी, असं वाटत असल्याचं सांगितलं. सिद्धार्थनं राज्यशास्त्र विषयातून पुण्यातील वाडिया कॉलेजमधून पदवी घेतली आहे. करोना काळात अभ्यासाची तयारी सुरु केली आणि दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाल्याचं त्यानं म्हटलं. अभ्यास सुरु ठेवणार असून पुन्हा परीक्षा देणार असल्याचं सिद्धार्थ म्हणाला.
मला जे पद भेटेल त्यावर काम करताना पूर्ण क्षमतेनं ते पूर्ण करणार आहे. माझ्याकडे जी जबाबदारी येईल ती वेळेत पार पाडण्याचा प्रयत्न असेल, असं सिद्धार्थ भांगे म्हणाला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना इन्स्टंट सक्सेस हवं असतं, त्यामुळं ते डिप्रेशनमध्ये जातात, मला देखील सुरुवातीला तसं वाटत होतं. पण, अभ्यास करताना समजलं यात इन्स्टंट काय ओव्हरनाइट सक्सेस तर अजिबात मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. साडेतीन वर्ष मेहनत केल्यावर यश मिळाल्याचं सिद्धार्थ भांगे म्हणाला. सिद्धार्थनं आयपीएस अधिकारी सुबोध मानकर, कपिल बुधवत, प्रविण चव्हाण आणि यूनिकचे प्रविण चव्हाण यांचं मार्गदर्शन मिळाल्याचं सांगितलं.