कर्नाटकमधील नव्या सरकारचा काल शपथविधी झाला. त्यावेळी पवार उपस्थित होते. शपथ घेताच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे पवार यांचे पाया पडले होते. याची चर्चा सुरू असताना दुसऱ्याच दिवशी राज्यातील पहिल्या जाहीर कार्यक्रमात पवार यांनी कर्नाटक पॅटर्नचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मी काल बंगळुरूला होतो. तेथे आता सामान्य जनतेचे नवे सरकार आले आहे. आधीच्या सरकारने माणसामाणसांत विदि्वेष वाढवायचे काम केले होते. तरीही अनेकांना वाटत होते की या निवडणुकीत तेथील सत्ताधारी पक्ष पुन्हा जिंकणार. मात्र, सामान्य माणसांनी एकजूट केली आणि चित्र बदलले. याची झलक शपथविधी सोहळ्यातही पाहायला मिळाली. या सोहळ्याला सुमारे एक लाख लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये ७० टक्के लोक विविध जातीधर्माचे आणि तरुण होते. तेथील कष्टकऱ्यांनी जी एकजूट दाखविली, त्यामुळे हे घडले. जर कर्नाटकात अशी एकजूट होऊ शकते, तर आता अन्य राज्यात कशी होत नाही हे आपल्याला पहावे लागेल, असेही पवार म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्याबद्दल बोलताना ते म्हणाले, हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. येथे सर्व घटकांसाठी काम करणारे नेते होऊन गेले. कष्टकऱ्यांचे नेते शंकरराव घुले यांनीही या क्षेत्रात मोठे काम केले. त्यामुळेच आज त्यांच्या पुतळ्याचे येथे अनावरण होत आहे. त्यांच्यावरील स्मरण ग्रंथही प्रकाशित होत आहे. मात्र, अशा जिल्ह्यातही आता काही शक्ती वातावरण बिघडवत आहेत. मी पेपरमध्ये वाचले की याच नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये एका घटनेमुळे दोन तीन दिवस बाजारपेठ बंद होती. जाती धर्मातील अंतर वाढविले जात आहे. संघर्ष होत आहे. हे वाढविण्याचे काम काही शक्ती करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध लढा देण्याचे काम आपल्यासमोर आहे. हा लढा देणाऱ्यांना कष्टकऱ्यांची साथ हवी. जर हे काम केले नाही तर कष्टकऱ्यांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार म्हणाले.