• Fri. Mar 20th, 2026

    Nashik News : उंटांवरचे शहाणे गुलदस्तातच! गौडबंगाल उलगडण्यात नाशिक पोलिसांना अपयश

    Nashik News : उंटांवरचे शहाणे गुलदस्तातच! गौडबंगाल उलगडण्यात नाशिक पोलिसांना अपयश

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दखल घेतल्यानंतर सतर्क झालेल्या नाशिक जिल्हा प्रशासनामुळे १५ संशयितांवर उंटांवरील छळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, प्राणी क्‍लेश प्रतिबंधक कायदा १९६० या अंतर्गत पोलिसांनी या छळामुळे मृत्युमुखी पडलेल्या १३ उंटांच्या मृत्यूप्रकरणीही संशयितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी प्राणिमित्रांनी केली आहे. तपासातील उदासीनतेमुळे हे उंट आले कुठून, कुठे आणि कशाला घेऊन जात होते हे उंटांच्या घरवापसीनंतरही उलगडू शकलेले नाही.

    मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातून उंटांना नेले जात असल्याच्या तक्रारी थेट राज्यपालांकडून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार तपोवनातून १११, तर मालेगावातून ४३ उंट जप्त करण्यात आले. दरम्यान, दिंडोरी पोलिसांनी संशयित उंट मालक गुटिया अब्दुल सय्यद, अस्लम रफिक सय्यद (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर नाका, नाशिक), दीपक मेहताब सय्यद व शाहरूख मेहताब सय्यद (दोघे रा. पंचवटी) आणि शाहनूर मिसऱ्या सय्यद, समीर गुलाब सय्यद, इजाज गुलाब सय्यद (तिघे रा. जालना) यांच्यावर गुन्हे दाखल करीत चौकशी पूर्ण केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. हे उंट कुठून, कशासाठी आणि कुठे घेऊन जात आहेत, याची खरी माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. हे सर्व उंट पर्यटकांच्या सफारीसह जत्रांमध्ये वापरले जातात, असा दावा मालकांनी केला. असाच प्रकार मालेगावातही घडला. तेथेही गफूर मेहताब सय्यद (वय ३८), बन्सी गुलाब सैय्यद (२८), सुलतान अब्दुल सय्यद (२२), सुलतान गफूर सय्यद (२३), अब्दुल करीम सय्यद (४९), सिकंदर गुलाब सय्यद (४०), मुबारक गुलाब सय्यद (३२), लुकमान गुलाब सय्यद (२३, सर्व रा. अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, हे उंट अवैधरीत्या कुठून आणले हे पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाही. त्यामुळे आता प्राणिमित्रांनी संताप व्यक्त केला असून, उंटांच्या मृत्यूलाही संबंधित संशयितांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

    पांजरापोळमध्ये आणखी ३ उंटांचा मृत्यू; आतापर्यंत १२ उंटांनी गमावले प्राण
    नाशिककरांसमोरील अनुत्तरित प्रश्न

    – राज्यात ‘प्राणी क्‍लेश प्रतिबंधक कायदा १९६०’ लागू आहे. या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास एक ते पाच वर्षांची शिक्षा अथवा दोन ते पाच हजारांपर्यंत दंड असून, हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. यानुसार संबंधितांवर कारवाई का झाली नाही?
    – उंटांचा निर्दयीपणे छळ केल्याने मृत्युमुखी पडलेल्या उंटांची जबाबदारी संशयितांवर का निश्चित केलेली नाही?
    – उंट मालकांनी आपणच मालक असल्याचा दावा केला होता, तर त्यांनी उंटांना परत पाठविताना मालकीचा दावा का केला नाही?
    – उंट इतक्या संख्येने कुठून आणण्यात आले, ते कुठे घेऊन जाणार होते हे पोलिसांना शोधणे अवघड होते का?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed