अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशाने पुरंदर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे. कारण अशोक टेकवडे यांच्यानंतर राष्ट्रवादीला पुरंदर मध्ये आमदारकीसाठी यश आले नाही. याचा मोठा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या ३८ वर्षांपासून जनता दलाचे दादा जाधवराव यांची सत्ता घालवण्याचे काम अशोक टेकवडे यांनी केले आहे. अशोक टेकवडे यांची शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
अशोक टेकवडे यांनी गेल्या काही दिवसांपासून पुरंदरच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पक्षीय राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्याकडे अनेकदा तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याशिवाय अशोक टेकवडे यांचा मुलगा सरपंच होऊ नये म्हणून स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच कुरघोडी केली होती. यामुळे देखील टेकवडे नाराज असल्याचे बोलले जात आहे..
अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशाने पुरंदरचा स्थानिक राष्ट्रवादीचा गट जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शरद पवार यांचा खंदा समर्थक भाजप प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला पुरंदर मध्ये खिंडार पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशावर काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशोक टेकवडे यांच्या पक्ष प्रवेशानं भाजपनं मोठी खेळी केली आहे.
