‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून शरद पवार अध्यक्ष होऊ शकतात, फक्त रयतच नाही तर अशा अनेक शिक्षण संस्था आणि सहकारी संस्था आहेत ज्यांची घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. मग अशावेळी ५० वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणात घातलं ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला ते कस काय दुसऱ्याला अध्यक्ष होऊ देतील. शरद पवार हे दुसऱ्या कोणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ देणार नाहीत’, अशी जोरदार टीका बावनकुळे यांनी केली आहे.
दुसऱ्यांनी उभ्या केलेल्या सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्थांचे अध्यक्ष होण्यासाठी ज्या लोकांनी घटना बदलली ते स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्याला कस होऊ देतील. रयत हे फक्त एक उदाहरण आहे, अशी ५० नावं आपल्याला सांगता येतील. यावर एक पुस्तक लिहिता येईल. असं देखील बावनकुळे म्हणाले आहेत.
‘राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे घरगुती तमाशा’
राष्ट्रवादी काँग्रेसचा जो तीन दिवसांचा खेळ होता महाराष्ट्रात जी नौटंकी झाली, ती म्हणजे घरगुती तमाशातील वगनाट्य होतं. त्यामुळे ही सगळी लिखित स्क्रिप्ट होती हे माहीतच होत. राष्ट्रवादीला प्रसिद्धीच्या झोतात राहायचं होत त्यासाठी त्यांनी ही नौटंकी केली. असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीनामा नाट्यावर केला आहे.
आजही आमच्याकडे १८४ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात १६ आमदारांच्या निलंबनावर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या जर विधानमंडळात बहुमत सिद्ध करायला सांगितले तर माझा दावा आहे १८४ पेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ऑक्टोबर २०२४ पर्यंत आमचं सरकार टिकेल आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या युतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्ते थांबले, भर पावसात गाडीतून उतरत पवारांनी आभार मानले!