• Sat. Sep 21st, 2024

कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार, समुद्रकिनारी जागेची मागणी; हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार?

कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार, समुद्रकिनारी जागेची मागणी; हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार?

म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी: कोकणात आणखी एक मोठा स्टील प्रकल्प येऊ घातला असून तशा हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून, त्यांनी नवा प्रकल्प कोकणात उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी केली आहे. या संदर्भात आठवडाभरापूर्वी औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर व आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि.चे राजेंद्र तोडापूरकर यांच्यात मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत कंपनीला अपेक्षित असलेल्या ठिकाणांची माहिती औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. या बैठकीत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली आहे.

Ratnagiri News: बारसू रिफायनरीविरोधातील लढ्याला मुंबईतून रसद, चाकरमानी तरुण कोकणाकडे निघाले

औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचविण्यात आलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्हयातील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास व पाहणी करून आता कंपनीकडून औद्योगिक विकास महामंडळाला कळविण्यात आल्यानंतर पुढील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. या सगळ्याला औद्योगिक विकास महामंडळातील उच्चपदस्थ सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. या कंपनीकडून ८० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली होती. यासाठी ५ हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याचीही विनंती केली.

बारसूमध्ये आंदोलक महिला हाताला चावल्या, सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांचा मोठा दावा

हजारो रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता

सध्या कोकणात विजयदुर्ग आणि जयगड बंदर (रत्नागिरी) रस्ते आणि रेल्वेने जोडण्याचा केंद्रीय दळणवळण विभागाचा प्रस्ताव आहे. याबाबतची घोषणा नितीन गडकरी यांनी पनवेल येथील कार्यक्रमात केली होती. त्यामुळे या कंपनीला कोकणातील किनारपट्टी भागात जागा देण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे या मोठ्या प्रकल्पासाठी अनुकूल आहेत. याबाबत जागानिश्चिती, उर्वरीत जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाइम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed