मुंबई : राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाला १९९९ ला पहिल्यांदाच सत्ता मिळाली आणि उपमुख्यमंत्रीपदासह वजनदार खाती पवारांनी स्वतःकडे ठेवली.. त्याचवेळी चाळीशीत असणाऱ्या एका अमेरिका रिटर्न तरूणाकडे राज्याचं अर्थमंत्री पद आलं, राज्याचे सर्वात तरूण अर्थमंत्री ठरलेले हे नेते म्हणजे जयंत पाटील.. पुढे याच जयंत पाटलांनी सलग १० वर्ष अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नावावर केला.. पुढच्या दोन दशकातही प्रत्येक पातळीवर पवारांचा विश्वास सार्थ ठरवला.. मोदी लाटेनंतर अनेकांनी पवारांची साथ सोडली असताना राष्ट्रवादीच्या विस्तारावर भर देणारा, अजित दादांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी पवारांशी निष्ठा दाखवून देणारा आणि पवारांनी निवृत्ती जाहीर करताच ढसाढसा रडणारा नेताही जयंत पाटीलच.. राष्ट्रवादीतील घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले जयंत पाटील पवारांच्या तालमीत कसे आले, वाचा…जयंत पाटलांना जरी राष्ट्रवादीने पहिल्यांदा मंत्री केलं असलं तरी त्यांचे वडील राजाराम बापू पाटील हे स्वतः शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळे पवार कुटुंबाचे संबंध हे दोन पिढ्यांपासूनचे आहेत.. १९७८ ला राजाराम बापू पाटील हे वसंत दादा पाटलांवर नाराज होऊन काँग्रेसमधून जनता दलात गेले. पुढे शरद पवारांच्या बंडाने वसंतदादांचं सरकार कोसळलं. जनता दलाच्या पाठिंब्यावर शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यामुळे पवारांच्या मंत्रिमंडळात राजाराम बापूंचा समावेश झाला. १९८४ ला राजाराम पाटलांचं निधन झाल्यानंतर शरद पवारांनी जयंत पाटलांना वडीलकीचा आधार दिला. पुढे जयंत पाटलांनी व्यक्तीकेंद्रीत राजकारण करत पवारांची ताकद वाढवली.
VIDEO: आमचे सगळ्यांचे राजीनामे घ्या, पण तुम्ही बाजूला जाऊ नका, जयंत पाटील धायमोकलून रडले
जयंत पाटील यांची राजकीय कारकीर्द
- १९८५ ला युवक काँग्रेसमधून राजकारणात सक्रीय
- १९९० च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार
- १९९३ ला शरद पवार मुख्यमंत्री होताच जयंत पाटलांची जवळीक वाढली
- शरद पवारांची त्यांच्या मतदारसंघात सभा घेतली
- १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना होताच जयंत पाटलांची शरद पवारांना साथ
- १९९९ मध्ये सत्तांतर घडताच अर्थमंत्री म्हणून जयंत पाटलांची वर्णी
- गृहमंत्री, ग्रामविकास, जलसंपदा अशा विविध खात्यांचे १५ वर्ष मंत्री राहण्याची संधी
- २०१८ ला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी निवड, ठाकरे सरकारमध्ये पुन्हा जलसंपदा मंत्री
Ajit Pawar : शरद पवारांनी ठरवलं तर अध्यक्ष होणार का? अजितदादा म्हणाले…
२०१४ मध्ये आघाडीच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला.. पक्षाला घरघर लागली. त्याचवेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पेलत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या विस्तारावर भर दिला.. निर्धार परिवर्तनाचा यात्रा, शिवस्वराज्य यात्रा, राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा.. अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या विस्तारात त्यांनी मोलाचा हातभार लावला.. पवारांनी निवृत्ती जाहीर करताच जयंत पाटलांनी आमचेही राजीनामे घ्या म्हणत भावनांना वाट मोकळी करुन दिली. सध्याच्या घडामोडींमुळे पवार आणि जयंत पाटलांमध्ये भावनिक नात्याचा सर्वांना परिचय आला.