अक्षय अप्पा पवार असं आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांचं नाव आहे.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.आदर्श गणेश नगरमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं या विद्यार्थ्यांचं नाव असून, तो मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमपीएससीची तयारी करत होता.
३० एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी तो बीडमध्ये आला होता.परीक्षेचा पेपर त्याला अवघड गेला होता. त्यामुळे तो चिंतेत होता. रविवारी परीक्षा दिल्यानंतर तो बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये त्याच्या मित्राच्या खोलीवर मुक्कामासाठी थांबला होता. पण एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने त्याने मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर, याबाबत मयत अक्षयच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी फोनवरून माहिती देताच तात्काळ कुटुंबातील अनेक जण घटनास्थळी दाखल होऊन आपल्या मुलाचा मृतदेह समोर पाहून एकच आक्रोश या कुटुंबातील लोकांनी केला.
दरम्यान, साधारणपणे ८० टक्के उमेदवारांची परीक्षेला उपस्थिती होती. या भरतीसाठी ‘एमपीएससी’तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एका परीक्षेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पदभरती केली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्याही ‘एमपीएससी’च्या इतिहासातील सर्वोच्च आहे.
परीक्षेसाठी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील एकूण एक हजार ४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याची माहिती ‘एमपीएससी’ने दिली.