“मी गाडीत बसलो आणि इतक्यात मला आईचा फोन आला. तुला माझी शप्पथ आहे, पुण्याला गेलास तर… आई म्हणाली. माझा मूड ऑफ झाला.. माझा पाय निघत नव्हता, सगळे मित्रही हिरमुसले. पण आईच्या ऑर्डरमुळे मी बाहेर आलो” असं आराध्य म्हणाला.
आराध्यची आई सुखदा जाधव यांनी मुलाला फोन करुन त्या बसने पुण्याला जाण्यापासून रोखलं. मला अस्वस्थ वाटतंय, असं आई म्हणाली. “आजी गेल्यामुळे आम्ही आधीच दुःखात होतो. तिने माघारी बोलावल्यामुळे आईला आणखी त्रास नको, म्हणून मी उतरलो. खरं तर मी तिच्यावर रुसलो होतो. रात्रभर तिच्याशी भांडलो, पण सकाळी अपघाताची बातमी आली आणि मी स्तब्ध झालो” असं आराध्य म्हणाला.
“मी आईला मिठी मारुन ढसाढसा रडत होतो. माझे हात पाय थरथरत होते. काही वेळ कोणाला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. मृतांमध्ये माझे अनेक मित्र होते. मी आईचं म्हणणं ऐकलं म्हणून आज सगळ्यांसोबत आहे. नाहीतर माझ्या जीवाचं काय झालं असतं कोणास ठावूक” असं बोलताना आराध्यचा आवाज कातर झाला. आम्ही स्वामी समर्थांचे भक्त असल्याने पत्नीच्या माध्यमातून स्वामींनीच तारल्याच्या भावना आराध्यच्या वडिलांनी व्यक्त केल्या.