• Tue. Mar 10th, 2026

    जेलमध्ये मला पाणीही न देण्याचा आदेश होता, तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा रडल्या

    जेलमध्ये मला पाणीही न देण्याचा आदेश होता, तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा रडल्या

    अमरावती : बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्ष कष्ट करुन शिवसेना उभारली, संघटना मोठी केली. पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कष्टाची माती केली. एवढा अन्याय करणारा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिला नव्हता, अशी टीका करताना जेलमधील आठवणी सांगताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.हनुमान जयंतीचे औचित्य साधत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आली. हनुमान चालिसा पठणानंतर झालेल्या कार्यक्रमात मंचावर भाषण देताना नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मी नेमका काय गुन्हा केला होता, ज्यामुळे मला १४ दिवस तुरुंगात काढावे लागले एवढंच नाही तर आणखीही महिनाभर मला तुरुंगात ठेवण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण भल्याभल्यांमधला अहंकार देव ठेचून काढतो, अशा शब्दात राणांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

    नवनीत राणा भर कार्यक्रमात रडल्या…

    मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठाणाचा आग्रह धरल्याने नवनीत राणा यांना तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात काढलेल्या त्या दिवसांची आठवण सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. पोलीस स्टेशनमध्ये गेले तर बसायला काहीच दिलं नव्हतं. रात्रभर मी उभी राहिले. तेव्हा एक पोलीस कॉन्स्टेबल मला येऊन म्हणाला, मॅडम रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही उभा आहात. आम्हाला हे पाहवत नाही. आम्हाला हे तुमचं दु:ख पाहवत नाही. बऱ्याच पोलिसांनी मला सांगितलं की ही जागा तुमच्यासाठी नाही. तुमच्यार अन्याय झालाय पण आम्ही हतबल आहोत, आम्ही काहीच करु शकत नाही, अशा भावना पोलिसांनी माझ्याजवळ बोलून दाखवल्या.

    जेलमध्ये मी पाणी मागितलं तर सीसीटीव्ही आहे म्हणून पोलीस पाणी देऊ शकत नाही, असं सांगायचे. पाणीही देऊ नका, असा त्यांना आदेश होता, असं सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. डोळे पुसत पुसतच त्यांनी आपलं पुढचं भाषण केलं. माझ्यासमोर बरॅकमध्ये १५० महिला राहत होत्या. त्यांना दिवसातून चार-पाच वेळा पाणी दिलं जायचं पण मला मात्र पाणीही मिळत नव्हतं. एवढा अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नव्हता. पण भल्याभल्यांमधला अहंकार देव ठेचून काढतो. हनुमान चालिसा पठणाला विरोध केला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं. बाळासाहेबांनी अपार कष्ट करुन शिवसेना संघटना उभारली, पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कष्टाची माती केली, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed