नवनीत राणा भर कार्यक्रमात रडल्या…
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठाणाचा आग्रह धरल्याने नवनीत राणा यांना तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात काढलेल्या त्या दिवसांची आठवण सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. पोलीस स्टेशनमध्ये गेले तर बसायला काहीच दिलं नव्हतं. रात्रभर मी उभी राहिले. तेव्हा एक पोलीस कॉन्स्टेबल मला येऊन म्हणाला, मॅडम रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही उभा आहात. आम्हाला हे पाहवत नाही. आम्हाला हे तुमचं दु:ख पाहवत नाही. बऱ्याच पोलिसांनी मला सांगितलं की ही जागा तुमच्यासाठी नाही. तुमच्यार अन्याय झालाय पण आम्ही हतबल आहोत, आम्ही काहीच करु शकत नाही, अशा भावना पोलिसांनी माझ्याजवळ बोलून दाखवल्या.
जेलमध्ये मी पाणी मागितलं तर सीसीटीव्ही आहे म्हणून पोलीस पाणी देऊ शकत नाही, असं सांगायचे. पाणीही देऊ नका, असा त्यांना आदेश होता, असं सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. डोळे पुसत पुसतच त्यांनी आपलं पुढचं भाषण केलं. माझ्यासमोर बरॅकमध्ये १५० महिला राहत होत्या. त्यांना दिवसातून चार-पाच वेळा पाणी दिलं जायचं पण मला मात्र पाणीही मिळत नव्हतं. एवढा अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नव्हता. पण भल्याभल्यांमधला अहंकार देव ठेचून काढतो. हनुमान चालिसा पठणाला विरोध केला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं. बाळासाहेबांनी अपार कष्ट करुन शिवसेना संघटना उभारली, पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कष्टाची माती केली, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
