म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मार्चमधील पावसाच्या तडाख्यामधून महाराष्ट्रातील शेतकरी सावरत असतानाचा एप्रिलमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये मात्र कोरडे वातावरण असू शकते. शुक्रवार आणि शनिवारी येथे आभाळ अंशतः ढगाळ असेल. तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शुक्रवारी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही पाऊस पडेल. या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद येथे शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. विदर्भात अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे शुक्रवारपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ आहे. शनिवारी वातावरण पुन्हा निवळण्याची शक्यता आहे. पश्चिमी प्रकोपाची स्थिती, विखंडीत वारे या प्रभावाखाली राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यामध्ये शनिवारी बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
७० टक्क्यांहून अधिक आर्द्रता
मुंबईमध्ये मंगळवारी तापमानाचा पारा फारसा चढा नसला, तरी उकाड्यामध्ये वाढ होत असल्याचे जाणवले. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३२.१, तर कुलाबा येथे ३१.४ अंश सेल्सिअस होते. हे तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा एका अंशाने कमी असूनही मुंबईकरांना उकाड्याची जाणीव झाली. राज्यात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणाचा परिणाम मुंबईवरही झाला आहे. मुंबईच्या आर्द्रतेत वाढ झाली आहे. संध्याकाळच्या सुमारास मंगळवारी मुंबईच्या दोन्ही केंद्रांवर ७० टक्क्यांहून अधिक आर्द्रता होती. त्यामुळे तापमान कमी असतानाही अस्वस्थता मात्र अधिक होती.
पोलीस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शक; खुल्या मैदानावर बैठक व्यवस्था तर 20 पेक्षाही अधिक कॅमेरे तैनात