• Sat. Sep 21st, 2024
ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आता भुयारी बोगदा, नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार

म. टा. प्रतिनिधी, ठाणेः ठाणे-बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या नियोजित भुयारी मार्गासमोरील पर्यावरणीय परवानग्यांची अट शिथिल झाल्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण व वनविभागाकडील पत्रव्यवहारानुसार प्रधान सचिवांकडून या प्रकल्पासाठी पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे कळवण्यात आल्याने या प्रकल्पावरील टांगती तलवार दूर झाली आहे. तर, दुसरीकडे या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वनजमिनीच्या बदल्यात पर्यायी वनीकरणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील उमरावती येथील ६० हेक्टर जागा वनविभागाला देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याने या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले आहेत. परंतु त्याचवेळी या प्रकल्पाचा खर्च ११ हजार कोटींवरून पाच हजार कोटींनी वाढून १६ हजार ६०० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी ठाणे ते बोरिवली अशा तीन अधिक तीन अशा सहा मार्गांचे दोन भुयारी बोगद्यांचे काम २०१५मध्ये एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पास सल्लागार म्हणून ऐइकॉम एशिया कंपनीची नेमणूकही करण्यात आली होती. परंतु २०२०मध्ये हा प्रकल्प मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने एमएमआरडीएकडून या प्रकल्पावर काम सुरू झाले. ठाणे घोडबंदर हा मुख्य रस्ता असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वाहतूक चालते. ठाणे ते बोरिवली या अंतरासाठी घोडबंदरमार्गे २३ किमी अंतर असून हे अंतर गर्दीच्या वेळी पार करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एक तासाहून अधिक काळ लागतो. ठाणे ते पश्चिम उपनगर मुंबई दरम्यानचा प्रवास कमी वेळात करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जुळ्या ट्युब बोगद्याचे बांधकाम केले जाणार असून हे अंतर १२ किमी इतके कमी होईल. बोगद्याचा भाग संरक्षित वनक्षेत्रातून जात असल्यामुळे बोगद्याच्या खोदकामासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मशिन्स’ या संस्थेचा अभिप्राय घेण्यात आला. या भागात ट्युनल बोअरिंग मशिन्सच्या सहाय्याने बोगद्याचे खोदकाम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात चर्चा करून ११.८५ किमी लांबीचा हा प्रकल्प तयार करण्यात आला असून त्यामध्ये १०.२५ किमी बोगदा आणि १.५५ किमी लांबीचा जोडरस्ता असा समावेश आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण परवानग्यांचा अडथळा येण्याची शक्यता होती. परंतु एमएमआरडीएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पास पर्यावरण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याने मोठा अडथळा दूर झाला आहे.

० प्रकल्पाचा खर्च १६ हजार ६०० कोटींवर

० या प्रकल्पाच्या भूसंपादनासह आणि बांधकाम रॉयल्टी वगळून एकूण खर्च १६ हजार ६०० कोटी इतका आहे. यामध्ये तीन पॅकेज तयार करण्यात आले आहेत.

पॅकेज १ – बोरिवली बाजूस ७ हजार २७३ कोटी, पॅकेज २ – ठाणे बाजूस ७ हजार ४६१ आणि पॅकेज ३ – यंत्रणांची खरेदी, स्थापन आणि कार्यान्वित करण्यासाठी ५३० कोटींचे नियोजन.

ठाणे-बोरिवली बोगद्याची वैशिष्ट्ये…

-बोगद्याचा बाह्य व्यास १३.५ मी

-मार्गिका – दोन मार्गिका अधिक एक आपत्कालीन मार्गिका

-प्रत्येक ३०० मीटर अंतरावर पादचारी क्रॉसिंग पॅसेज आणि प्रत्येकी दोन पादचारी क्रॉसिंग पॅसेजनंतर वाहन क्रॉसिंग पॅसेजची तरतूद असे एकूण ४५ क्रॉसिंग पॅसेज

-अग्निशमन यंत्रणा, पाण्याची नळी, धुरांची डिटेक्टर, प्रकाशित प्रतिबिंब (एलईडी लाईट साईन बोर्ड)

-बोगद्याला हवेशीर करण्यासाठी नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने वायुविजन प्रणाली

-चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन.

-४९.४८ हेक्टर भूसंपादन करावे लागणार असून त्यामध्ये ३७.६३ हेक्टर सरकारी वन क्षेत्र तर ११.९१ खासगी जमीन आहे.

-४.४३ किमी ठाणे जिल्ह्यातून व ७.४ किमीचा मार्ग बोरिवलीतून जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed