• Fri. Mar 6th, 2026
    बरं झालं हा प्रकार छत्रपतींच्या वारसांबरोबर झाला, हाच तो सनातनी मनुवादी धर्म, आव्हाड संतापले

    मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या असता पूजा करताना तेथील पुजाऱ्याने वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. या साऱ्या प्रकारावर संयोगिताराजे संतापल्या. त्यांनी तेथील पुजाऱ्याला झापलं. ज्यांच्यामुळे ही मंदिरं वाचली, त्यांच्या घराण्यातील लोकांनाही वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही काय? असा सवाल त्यांनी तेथील पुजाऱ्याला विचारला. या प्रकरणी राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेचा धिक्कार केलाय. ‘काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा’ अशा शब्दात आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय.

    सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, आव्हाड संतापले

    छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना हेच सनातन मनुवादी शुद्र म्हणाले. हेच सनातनी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बरं झालं हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झालं… अशा संतप्त भावना जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे व्यक्त केल्यात.

    जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही वर्ण व्यवस्था टिकवून आहे. अजून कुठला पुरावा हवा? आज छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय? असा सवाल करीत हाच तो सनातन धर्म जो तुम्हाला शुद्रच मानतो, त्यामुळे बहुजनांनो डोळे उघडा… असं आवाहन आव्हाडांनी केलंय.

    ह्याच काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी मंदीर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केले होते. काही सनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते असे सनातनी धर्म परिषदेत फुशारक्या मरतात, असा समाचारही आव्हाडांनी घेतला.

    देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. याचंच औचित्य साधून संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन भगवान रामाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. पूजावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र पुजाऱ्याने त्यास विरोध करत पुराणोक्त पद्धतीचे मंत्र पठण सुरुच ठेवलं. या साऱ्या प्रकारावर मात्र संयोगिताराजे चांगल्याच संतापल्या. त्यांनी पुजाऱ्याला झाप झाप झापून, या साऱ्या प्रकरणावर सविस्तर पोस्ट लिहिलीये.

    नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव? संयोगिताराजे छत्रपती संतापल्या
    संयोगिताराजे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

    स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.. आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.


    नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed