दरवर्षी पावसात माटुंगा ते चेंबूरमधील सखल भागांत पाणी तुंबण्याच्या समस्येला मुंबईकरांना सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने माहुल पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्याला दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. परवानग्यांची किचकट प्रशासकीय प्रक्रिया पाहता त्यास वेळ जाणार असून पावसाळ्यापूर्वी त्या मिळणे कठीण असल्याचे सांगितले जाते आहे. या स्टेशनसाठी मिठागराची ६.१७६ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारच्या मीठ आयोगाने मंजुरी दिली आहे. मिठागराच्या जागेच्या मोबदल्यात मुंबई महापालिका केंद्र सरकारला ११८ कोटी रुपये मोजणार आहे.
पम्पिंग स्टेशन कशासाठी?
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांत पाणी तुंबून मुंबई ठप्प होते. पूरमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिका प्रशासन सन २००६पासून ब्रिमस्ट्रोवॅडसह अनेक प्रकल्प राबवत आहे. हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पम्पिंग स्टेशन उभारली आहेत. माहुल पाठोपाठ मोगरा पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. मोगरा पम्पिंगचे काम जागा आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेत आहे.
