• Mon. Mar 9th, 2026

    यंदाही मुंबईत पाणी तुंबण्याची दाट शक्यता; माहुल पम्पिंगच्या कामात अडथळा, कारण काय?

    यंदाही मुंबईत पाणी तुंबण्याची दाट शक्यता; माहुल पम्पिंगच्या कामात अडथळा, कारण काय?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः माहुल पम्पिंग स्टेशनसाठी वडाळा-आणिक आगार येथील मिठागराची जागा देण्यास केंद्र सरकारच्या मीठ आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण व सीआरझेड विभागाच्या परवानग्या मिळणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. परवानग्यांसाठी आणखी तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही गांधी मार्केट, चेंबूर सिंधी सोसायटी, नेहरू नगर, माटुंगा, कुर्ल्यासह सायन परिसरात पाणी तुंबण्याची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.

    दरवर्षी पावसात माटुंगा ते चेंबूरमधील सखल भागांत पाणी तुंबण्याच्या समस्येला मुंबईकरांना सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने माहुल पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्याला दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. परवानग्यांची किचकट प्रशासकीय प्रक्रिया पाहता त्यास वेळ जाणार असून पावसाळ्यापूर्वी त्या मिळणे कठीण असल्याचे सांगितले जाते आहे. या स्टेशनसाठी मिठागराची ६.१७६ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारच्या मीठ आयोगाने मंजुरी दिली आहे. मिठागराच्या जागेच्या मोबदल्यात मुंबई महापालिका केंद्र सरकारला ११८ कोटी रुपये मोजणार आहे.

    पम्पिंग स्टेशन कशासाठी?

    मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांत पाणी तुंबून मुंबई ठप्प होते. पूरमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिका प्रशासन सन २००६पासून ब्रिमस्ट्रोवॅडसह अनेक प्रकल्प राबवत आहे. हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पम्पिंग स्टेशन उभारली आहेत. माहुल पाठोपाठ मोगरा पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. मोगरा पम्पिंगचे काम जागा आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed