• Sat. Sep 5th, 2026

आपत्कालीन भारनियमनाने नागरिकांना त्रास नको; पूर्वसूचना द्या – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 5, 2026

सोलापूर, दि. ५ : जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक तसेच कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाबाबत योग्य नियोजन करावे. भारनियमनाची आवश्यकता असल्यास नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, तसेच आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील विद्युत भारनियमनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी आज दुपारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या भारनियमनाची माहिती दिली. मागील दोन दिवसांत अनुक्रमे चार आणि सहा तास आपत्कालीन भारनियमन करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली. यावर पालकमंत्री गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अचानक होणाऱ्या भारनियमनामुळे विशेषतः कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या कामात अडथळे निर्माण होतात. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारचे आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारनियमन करणे अपरिहार्य असल्यास त्याबाबतची पूर्वसूचना ग्राहकांना देण्यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी. भारनियमनाचा कालावधी आणि त्यामागील कारणांची माहिती नागरिकांना स्पष्टपणे मिळेल, याची दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत ग्राहकांनी दूरध्वनीवरून अथवा प्रत्यक्ष कार्यालयात विचारणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सौहार्दपूर्ण आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत. नागरिकांशी उद्धटपणे अथवा चुकीच्या पद्धतीने संवाद साधू नये. ग्राहकांना भारनियमनाचा कालावधी, कारणे आणि वीजपुरवठा सुरळीत होण्याबाबतची उपलब्ध माहिती स्पष्टपणे द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, पंढरपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत पालकमंत्री गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याकडून खुलासा घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही जिल्ह्यातील सर्व विद्युत अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन जबाबदारीने, संयमाने आणि सौहार्दपूर्ण पद्धतीने संवाद साधण्याच्या सूचना दिल्या. वीजपुरवठ्याबाबत नागरिकांना शक्य तेवढी मदत करावी आणि त्यांच्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed