नागपुरात तब्बल 23 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपीवर खोटं सोनं गहाण ठेवून कर्ज मिळावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून ते बँकेत गहाण ठेवत कोट्यवधी रुपयांचे गोल्ड लोन घेतल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कथित मास्टरमाइंड सचिन राऊत याला अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या विविध शाखांमधील तब्बल 152 गोल्ड लोन खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. या कथित फसवणुकीची रक्कम 23 कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा खुलासा 18 ऑक्टोबर 2025 रोजी गोल्ड लोन खात्यांच्या ऑडिटदरम्यान झाला. एका खात्यात गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासाचा विस्तार करत आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या विविध शाखांमधील गोल्ड लोन खात्यांची तपासणी सुरू केली.
तब्बल 152 गोल्ड लोन खात्यांमध्ये कथित अनियमितता
मनीष नगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन येथील शाखांमध्ये तपास केल्यानंतर 152 गोल्ड लोन खात्यांमध्ये कथित अनियमितता आढळली. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार, सचिन राऊत हा या संपूर्ण प्रकरणाचा कथित मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.
आरोपीने घोटाळा नेमका कसा केला?
सचिन राऊतने 2018-19 मध्ये स्वतः ICICI बँकेतून गोल्ड लोन घेतले होते. त्यानंतर त्याने आपल्या कर्जाची मर्यादाही वाढवून घेतली. पुढे त्याने कथितरित्या बनावट गोल्ड लोन ग्राहकांची व्यवस्था करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून विविध शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलण्यात आल्याचा संशय आहे.
सोन्याचे मुल्यांकन करणाराही संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणात सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या अप्रेझर नंदू खरवडेची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याने तब्बल 155 बनावट दागिने खरे असल्याचे प्रमाणित केल्याचा आरोप आहे. प्रत्येक मूल्यांकन अहवालासाठी त्याला कथितरित्या पाच हजार रुपये मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच मित्र, नातेवाईक आणि परिचितांसह 38 कथित बनावट ग्राहकांची ओळख उपलब्ध करून दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने कशी कारवाई केली?
आर्थिक गुन्हे शाखेने संशयित गोल्ड लोन खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याबरोबरच आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्डचीही (CDR) पडताळणी केली. या तपासातून कर्जदार, दागिन्यांचे अप्रेझर आणि बँकेशी संबंधित व्यक्तींमध्ये झालेल्या संपर्काची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकून मोबाइल फोन, लॅपटॉप, वाहने, बँकेशी संबंधित कागदपत्रे तसेच कथित बनावट ग्राहकांच्या याद्या जप्त करण्यात आल्या.
कर्ज देताना नियमांचे पालन झाले होते का?
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता बँक अधिकारी, गोल्ड लोन विभागातील कर्मचारी, अप्रेझर तसेच ऑडिटरपर्यंत पोहोचला आहे. कर्ज मंजूर करताना बँकेच्या नियमांचे पालन झाले होते का? बनावट दागिने मूल्यांकन प्रक्रियेत अस्सल म्हणून कसे प्रमाणित झाले आणि त्यांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज कसे मंजूर झाले, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कधी येणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
23 कोटी 31 लाख रुपयांच्या फसवणुकीचा तपास सुरु
गोल्ड लोन मंजूर झाल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी खात्यांचे ऑडिट करणारे प्रमोद टेटे, राजेंद्र शिलंकार आणि धनंजय धोमणे यांची भूमिकाही तपासली जात आहे. कथितरित्या पैशांच्या मोबदल्यात बनावट दागिन्यांना खरे सोने असल्याचे प्रमाणित करून अहवाल दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सचिन राऊतसह आतापर्यंत सात आरोपींना अटक झाली असून, 152 गोल्ड लोन खात्यांमधील कथित गैरव्यवहार आणि 23 कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा