• Thu. Aug 27th, 2026

Versova-Dahisar-Bhayandar Coastal Road : 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार, वर्सोवा-दहिसर-भाईंदर प्रकल्पाचे काम सुसाट

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेकडून रस्त्याची महत्त्वाचे कामे केली जात आहे. त्यापैकीच वर्सोवा-दहीसर-भाईंदर कोस्टल रोडचे काम जोरात सुरु आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर मरीन ड्राईव्हवरुन थेट भाईंदरपर्यंत जाता येणार आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईला जोडण्यासाठी काही महत्त्वकांक्षी प्रकल्प सध्या सुरु आहेत. यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे उत्तर किनारी भागाला सुरु असलेल्या वर्सोवा-दहिसर-भाईंदर या मार्गाला गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पामुळे अंधेरीतील वर्सोवा आणि ठाणे जिल्ह्याच्या भाईंदरपर्यंतचा प्रवास खूप कमी वेळाचा होणार आहे. विशेष म्हणजे सध्या वर्सोवा ते भाईंदर जाण्यासाठी रस्ते मार्गाने 2 तासांचा अवधी लागतो. पण वर्सोवा-दहिसर-भाईंदर या नव्या सागरी किनारी मार्गामुळे दोन तासांचा प्रवास हा 20 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे सर्वासामन्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचे काम पूर्ण

मुंबई महापालिकेने या प्रकल्पलाच्या कामाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम दक्षिण मुंबईत पूर्ण झाले आहे. मरीन ड्राईव्हपासून वरळीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. आता यानंतर उत्तर मुंबईतील किनारी रस्त्याच्या कामाला गती मिळताना दिसत आहे. वर्सोवा-दहिसर-भाईंदर अशा या मार्गाचे काम मुंबई महापालिकेकडून केले जात आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेकडूनच दहिसर-भाईंदर उन्नत मार्गाचे देखील जोरात सुरु आहे. मुंबई महापालिकेचे प्रकल्पाचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतंच या उन्नत मार्गाच्या कामाची पाहणी केली आहे.

वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम सुरु

मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्त्वकांक्षी आणि मोठा असा हा प्रकल्प आहे. खरंतर आंतरबदल आणि जोडरस्ते मिळून एकूण 60 किमीचे प्रकल्प आहे. यातून वर्सोवा आणि भाईंदर किनारा रस्त्याने जोडले जाणार आहेत. दरम्यान, वर्सोवा-दहिसर-भाईंदर प्रकल्पाचे कामे हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केले जात आहेत. ए, बी, सी, डी, ई, एफ, दहिसर-भाईंदर जोडरस्ता (डीबीएलआर) अशा सात टप्प्यांमध्ये या रस्त्यांची कामे विभागली गेली आहेत.

प्रकल्पात कोणकोणते रस्ते, बोगदे बनवले जाणार?

या प्रकल्पाच्या माध्यमातून दुहेरी उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ते, दोन केबलवर आधारीत पूल, चार बास्केट पूल, 15 मीटर व्यासाचे दोन जुळे बोगदे आणि 10 आंतरबदल उभारण्यात येणार आहेत. तसेच मालाड-चारकोप दरम्यान येथे 7.8 किमीचे जुळे बोगदे तयार केले जाणार आहे. त्यासाठी खोदकाम सुरु झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.

रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर कनेक्टिविटी वाढणार

एकीकडे नरिमन पॉईंट-भाईंदर या प्रकल्पाचे काम सुरु आहे. नरिमन पॉईंट-वरळी दक्षिण सागरी किनारा मार्ग तयार झाला आहे. दुसरीकडे वांद्रे-वर्सोवा रस्त्याचे काम राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडून सुरु आहे. तसेच वरळी-वांद्रे सेतू सर्वश्रूत आहे. सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाले तर नरिमन पॉईंटहून भाईंदरपर्यंत थेट समुद्र किनाऱ्यापासून रस्ते मार्गाने कमी वेळेत जाता येणार आहे.