• Tue. Jul 21st, 2026
    Marathwada Dam Water Level: धरणांत जेमतेम जलसाठा; मराठवाड्यात पावसाची तूट, ‘जायकवाडी’त 31.24 टक्के पाणी

    Marathwada Dam Water Storage: मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून, या महिन्यातही पुरेसा पाऊस झाला नसल्यास पाणीटंचाईचे आव्हान आहे.

    मराठवाडा धरण पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने धरणसाठा घटला आहे. मोठ्या ११ धरणांत केवळ ३५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मध्यम आणि लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत.

    विभागात जुलैच्या मध्यानंतरही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, मराठवाड्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे शेतीसह सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी नदी-नाल्यांना पूरच न आल्यामुळे धरणांत पाणीसाठा झालेला नाही. विभागात आतापर्यंत २४८ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८२ मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ७३.४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची तूट कायम असल्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

    Maharashtra TimesCrime News: वादातून विद्यार्थिनीचा विनयभंग; आई, वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण तर घरासह कारचीही केली तोडफोड!
    जायकवाडी धरणात ३१.२४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. निम्न दुधना २३.६६, येलदरी ५१.८९, माजलगाव १६.६७, मांजरा १६.३९, पैनगंगा ४७.११, मानार ४२.१८, निम्न तेरणा २९.३६, विष्णुपुरी ३४.४६ टक्के अशी धरणनिहाय उपलब्ध पाण्याची टक्केवारी आहे. सिना कोळेगाव आणि सिद्धेश्वर धरणात पाणीसाठा नाही. विभागातील मोठ्या धरणांत सद्यस्थितीत ३४.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

    ऊर्ध्व भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात काही प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी जायकवाडीचा पाणीसाठा २८ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांवर पोहोचला होता. इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा वाढलेला नाही.

    Maharashtra TimesCrime News : टेकडीवर वॉकिंगला गेलेल्या उच्चशिक्षित तरुणींची छेडछाड, पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; छ.संभाजीनगरमध्ये काय घडलं?
    गुरुवारनंतर जोर वाढण्याचा अंदाज
    गेल्या चोवीस तासांत विभागात सरासरी ७.१ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५.८ मिमी पाऊस झाला आहे. जालना ८, बीड ३.३, लातूर ०.९, धाराशिव ३.२, नांदेड १३.१, परभणी ११.३ आणि हिंगोली १०.७ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. या तुरळक पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसला आहे. एकूण ३५ टक्के क्षेत्रावर अजूनही पेरणी झालेली नाही. पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होणार आहे. २३ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा