• Mon. Jul 20th, 2026

    Crime News: धक्कादायक! नवी मुंबईतील तरुणाला नोकरीच्या आमिषाने बँकॉकला नेलं, नंतर भलतंच घडलं; फोनवरील संभाषणाने धास्ती वाढली

    Crime News: धक्कादायक! नवी मुंबईतील तरुणाला नोकरीच्या आमिषाने बँकॉकला नेलं, नंतर भलतंच घडलं; फोनवरील संभाषणाने धास्ती वाढली

    Navi Mumbai News: नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक घटना घडली असून कुटुंबाची धाकधूक वाढली आहे.

    धक्कादायक! नवी मुंबईतील तरुणाला नोकरीच्या आमिषाने बँकॉकला नेलं, नंतर भलतंच घडलं; फोनवरील संभाषणाने गूढ वाढले!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, पनवेल: परदेशातील चांगल्या नोकरीच्या आमिषाला बळी पडून तळोज्यातील एका तरुणाच्या आयुष्याला भीषण वळण लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या आमिषाने सदर तरुणाला प्रथम बँकॉकला नेण्यात आले आणि नंतर म्यानमारमध्ये एका टोळीच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलाच्या सुटकेसाठी कॅन्सरग्रस्त आईचे मंगळसूत्र आणि दागिने विकून तब्बल आठ लाख रुपये उभे करून दिले, तरीही हा तरुण परदेशातच अडकून असल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तळोज्यातील २३ वर्षीय तरुणाला काही एजंटांनी आकर्षक नोकरीचे आमिष दाखवत परदेशात पाठवले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, बँकॉकला पोहोचल्यानंतर त्याच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता संभाषणात बदल जाणवू लागला आणि नंतर त्याला जबरदस्तीने म्यानमारमध्ये नेऊन एका टोळीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली.

    एकीकडे मुलाच्या जीवाची चिंता, तर दुसरीकडे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईचे उपचार. अशा कठीण परिस्थितीतही कुटुंबाने हार मानली नाही. आईचे मंगळसूत्र, दागिने आणि घरातील मौल्यवान वस्तू विकून संबंधितांकडे सुमारे आठ लाख रुपये पाठवल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलाची सुटका न झाल्यामुळे त्यांची निराशा आणखी वाढली आहे. तरुणाचे वडील राजेश यांनी पोलीस, शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांकडे वारंवार मदतीची याचना केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “आमचा मुलगा जिवंत परत आणा,” एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. मानवी तस्करीच्या संशयातून या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून साहिलची सुरक्षित सुटका करण्यासाठी केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणांनी तातडीने समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

    दरम्यान, या प्रकरणातील मानवी तस्करी, खंडणीची मागणी आणि आर्थिक व्यवहारांबाबतचे आरोप हे संबंधित कुटुंबीयांनी केलेले असून, त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. परंतु एका कुटुंबात घडलेल्या या वेदनादायी प्रसंगात संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून साहिलला सुरक्षित मायदेशी परत आणावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.