• Sun. Jul 19th, 2026
    हॉर्न वाजवून लक्ष वेधलं, दोन कार चालकांची समयसूचकता, कोस्टल रोड बोगद्यात गाडी पेटण्यापूर्वी कुटुंबाची थरारक सुटका

    Mumbai News : दोघा कार चालकांनी हॉर्न वाजवायला सुरुवात केली, गाडीला ओव्हरटेक केले आणि गाडीतून काहीतरी खाली पडत असल्याचे सांगण्यासाठी हातवारे करत पेटलेल्या कारमधील कुटुंबाला सावध करण्याचा प्रयत्न केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : कोस्टल रोडच्या बोगद्यात बुधवारी एका कारला लागलेल्या आगीतून एक कुटुंब बालंबाल बचावलं. दोन कार चालकांनी हॉर्न वाजवून धोक्याचा इशारा दिल्यामुळे पाच जणांचे प्राण वाचले. केंद्र सरकारचे निवृत्त अधिकारी सुधीर नायर अपघातग्रस्त गाडीतून प्रवास करत होते. वेळीच इशारा मिळाल्याने त्यांच्या ड्रायव्हरने कार थांबवली आणि पाचही जणांना सुरक्षितपणे बाहेर पडता आले.

    कुटुंबासह फेरफटका मारायला निघाले

    वयाची ८० पार केलेल्या आई आणि वृद्ध काका-काकू यांच्यासोबत मुंबईची निवांत सफर करण्याचा बेत काही क्षणांतच गोंधळात बदलला. “आमच्या फेरफटक्याचा शेवट बोगद्यामध्ये गाडी जळून खाक होण्यात होईल, अशी आम्ही कधीच कल्पना केली नव्हती” असे सुधीर नायर म्हणाले.

    सुधीर नायर यांच्या मातोश्री मोठ्या कालावधीनंतर मुंबईला आल्या होत्या. त्यांना वांद्रे-वरळी सी-लिंक आणि कोस्टल रोडसह मुंबईतील काही नवीन प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यासाठी हे कुटुंब बाहेर पडले होते.

    दोन कार चालकांमुळे पहिल्यांदा समजलं

    धोक्याची पहिली सूचना गाडीच्या आतून नाही, तर त्यांच्या मागे असलेल्या दोन वाहन चालकांकडून मिळाली. त्यांनी हॉर्न वाजवायला सुरुवात केली, गाडीला ओव्हरटेक केले आणि गाडीतून काहीतरी खाली पडत असल्याचे दर्शवण्यासाठी हातवारे करत सावध करण्याचा प्रयत्न केला.
    Maharashtra TimesCrime News : 8 वर्षांच्या रिलेशननंतर प्रेमभंग, मुंबईत तरुणीने जीवन संपवलं, कुटुंबीयांनी बॉडी प्रियकराच्या घरी नेली, मंगळसूत्र घालून अंत्यविधी करण्याची मागणी
    “दोन वेगवेगळ्या वाहन चालकांनी आम्हाला सावध केल्यामुळे मी त्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले” असे नायर म्हणाले. “मी माझ्या चालकाला गाडी बाजूला घेऊन तिची तपासणी करायला सांगितले. गाडीत जळल्याचा कोणताही वास येत नव्हता, ती ओव्हरहीट झाली नव्हती किंवा त्यातून धूरही येत नव्हता. सर्व काही अगदी नॉर्मल वाटत होते.”

    काळ्या धुराचा लोट पसरला

    चालकाने गाडीचे बोनेट उघडताच परिस्थिती बदलली. “काळ्या धुराचा एक मोठा लोट बाहेर पडला. तेव्हाच मला जाणीव झाली की आपण धोक्यात आहोत” असे नायर म्हणाले. त्यांनी सांगितले की, त्यांची पेट्रोलवर चालणारी गाडी आठ वर्षे जुनी होती. तिने केवळ १३,००० किलोमीटरचा प्रवास केला होता आणि तिची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करण्यात आली होती.

    Anjali Damania On Thackeray Brothers | ‘ही दोन माणसं घरात बसून पाठिंबा देतात’

    बोगद्यात धूर अन् वाहतूक कोंडी

    आग पसरल्यास कारची ‘सेंट्रल लॉकिंग’ यंत्रणा निकामी होऊ शकते या भीतीपोटी त्यांनी तातडीने आपल्या वृद्ध आई आणि काका-काकूंना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी कारला वेढा घातला आणि बोगद्यात दाट काळा धूर पसरला. यामुळे दृश्यमानता कमी होऊन वाहतूक ठप्प झाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, परंतु आग विझवली जाईपर्यंत गाडीचा केवळ जळून खाक झालेला सांगाडा उरला होता.

    तो दिवस आठवताना सुधीर नायर म्हणतात की, त्यांचे कुटुंब अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने वाचले. “आम्ही थोडासाही उशीर केला असता, तर आम्ही सर्वजण त्या पेटत्या कारमध्ये अडकलो असतो. माझ्या आईचे वय ८० वर्षांहून अधिक आहे, तर माझे काका आणि काकू ७५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ते स्वतःहून बाहेर पडूच शकले नसते. त्या काही क्षणांनीच जीवन-मृत्यूमधील रेषा स्पष्ट झाली.”

    …तर आमचे प्राण धोक्यात

    सुधीर नायर यांचे म्हणणे आहे की, त्यांचे प्राण वाचवण्यात त्या दोन वाहन चालकांचा मोलाचा वाटा आहे. “काहीतरी विचित्र गोष्ट घडत असल्याचं लक्षात येऊन त्यांनी आम्हाला वेळीच थांबवले नसते, तर खूप उशीर होईपर्यंत आम्हाला काय घडत आहे हे समजलेच नसते. त्यांच्या प्रसंगावधानाने पाच जणांचे प्राण वाचले” असे ते म्हणाले.
    Maharashtra TimesAtul Pawar : अतुल साप चावल्याने गेला! स्कूल संचालकाच्या बायकोचे स्कूल बसचालकाशी संबंध, पतीचा काटा काढला, पण पवार कुटुंबाने छडा लावलाच
    या घटनेमुळे त्यांचे कुटुंब अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेले नाही. तसेच त्यांनी पोलीस आणि इतर मदतनीसांचेही आभार मानले, ज्यांनी त्यांच्या वृद्ध नातेवाईकांना सुखरुप घरी परतण्यास मदत केली.

    “आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आणि विशेषतः वेळेवर आम्हाला सावध करणाऱ्या त्या दोन वाहन चालकांचे आम्ही आभारी आहोत. अन्यथा याचे परिणाम अत्यंत दुर्दैवी ठरु शकले असते. ईश्वराची आमच्यावर कृपा आहे” असेही सुधीर नायर म्हणाले.