• Wed. Jul 8th, 2026

    Raigad Flood : पाताळगंगा नदीत 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेले, धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे आदेश

    Raigad Flood : पाताळगंगा नदीत 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेले, धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे आदेश

    रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील चावणे येथे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना घडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील अंदाजे 3 हजार गॅस सिलेंडर (काही भरलेले तर काही रिकामे) पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीत किंवा नदीकाठावर आढळणाऱ्या सिलेंडरना हात लावू नये, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

    चावणे येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील एचपीसीएलच्या प्लॉट क्रमांक ई-१/७ मधून हे सिलेंडर पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. त्यामुळे पाताळगंगा नदीच्या काठावरील विविध गावांमध्ये हे सिलेंडर वाहून येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

    धोकादायक ठरु शकतं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

    जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “नदीत वाहून आलेल्या सिलेंडरमध्ये गॅस आहे की नाही किंवा ते सुरक्षित स्थितीत आहेत का, याची खात्री नसते. त्यामुळे उत्सुकतेपोटी किंवा वापरासाठी असे सिलेंडर उचलणे, हलविणे, उघडणे किंवा घरी नेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वतः कोणतीही जोखीम घेऊ नये”, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

    सिलेंडर सापडल्यास जमा करण्याचे आवाहन

    “ज्या नागरिकांना असे सिलेंडर सापडतील त्यांनी ते स्वतःजवळ न ठेवता एचपीसीएल कंपनी, जवळच्या एचपीसीएल वितरकाकडे, तहसीलदार कार्यालय, खालापूर, तहसीलदार कार्यालय, पेण किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात तात्काळ जमा करावेत”, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

    सिलेंडर आढळल्यास त्याची माहिती तातडीने महसूल विभाग, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला द्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

    संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचं आवाहन

    मुसळधार पावसामुळे नदीपात्रात विविध वस्तू वाहून येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, संशयास्पद वस्तूंना हात लावू नये आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांमार्फत सिलेंडर शोधून सुरक्षितरीत्या परत मिळविण्याचे काम सुरू आहे.

    दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते पाहिल्यानंतर रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती किती भयानक आहे, याची प्रचिती येत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा