• Tue. Jun 30th, 2026

    कोकणात सर्वदूर पाऊस सक्रिय, पुण्यातही मेघगर्जनेसह कोसळणार; ४८ तासांसाठी मुंबई, ठाण्यात ‘ऑरेंज अलर्ट’

    कोकणात सर्वदूर पाऊस सक्रिय, पुण्यातही मेघगर्जनेसह कोसळणार; ४८ तासांसाठी मुंबई, ठाण्यात ‘ऑरेंज अलर्ट’

    Mumbai Orange Alert: काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईत रविवारपासून पावसाने जोर पकडला असून जुलै महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रुसलेल्या मोसमी पावसाने रविवार रात्रीपासून मुंबई आणि महानगर परिसरात झोकात पुनरागमन केले. नभांतून बरसलेल्या अमृतधारांनी अवघा कोकणपट्टा सुखावला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना उद्या, बुधवारसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.

    रविवार रात्रीपासून पाऊस सक्रिय

    मुंबईमध्ये रविवार रात्रीपासून मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले. सोमवार सकाळपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. सांताक्रूझ येथे रात्रीपासून सक्रिय झालेल्या पावसामुळे सकाळी ८.३० पर्यंत १०३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी रात्रीपासून उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत सांताक्रूझ केंद्रावर १०३.१ मिलीमीटर तर कुलाबा येथे ३०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महापालिकेच्या नोंदीनुसार मुलुंड येथील महापालिका शाळेमध्ये २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गवाणपाडा अग्निशमन दल केंद्र येथे १६७ मिलीमीटर, वर्सोवा येथे १६७ मिलीमीटर, गोरेगाव येथे १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

    Maharashtra TimesMumbai News: मुंबईत सातही धरणांमधील पाणीसाठा ७ टक्क्यांवर, वैतरणा-तानसा जवळजवळ रिकामे; जुलैमधील पावसामुळे दिलासा मिळणार?

    त्यानंतर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवार सकाळपर्यंतच्या कालावधीसाठी अद्ययावत इशारा जारी केला. त्यावेळी मुंबईसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला. ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठीही ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला तर पालघर जिल्ह्यासाठी रेड देण्यात आला. त्यानंतर दिवसभरात महामुंबईत परिसरात किरकोळ पावसाची नोंद झाली.

    १ जुलैपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल तशीच मुसळधार पावसाची व्याप्तीही वाढेल अशी शक्यता आहे. १ जुलै रोजी पालघर आणि सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकेल. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासाठी यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. २ जुलैला याची व्याप्ती वाढून संपूर्ण कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील पावसाचा जोर घाट परिसरातही दिसेल. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार तसेच अति मुसळधार पाऊस २ जुलैपर्यंत अपेक्षित आहे.

    आजचा अंदाज

    मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना आज, मंगळवारी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र ऑरेंज देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

    शहरात सोमवारी दिवसभर आकाश ढगाळ होते आणि दुपारनंतर काही भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. घाट माथ्यावर मध्य स्वरूपाचा पाऊस पडला. ताम्हिणीमध्ये २४ तासांत १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, संध्याकाळी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: पावसाचा जोर वाढणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोकण ते विदर्भ कुठे किती बरसणार? IMDचा अंदाज समोर

    अनुकूल घडामोडींमुळे गेल्या आठवड्यात शहरात पाऊस पडला. मात्र, दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते, उकाडाही वाढला होता. त्यामुळे दुपारीच पावसाला सुरुवात होईल अशी पुणेकरांची अपेक्षा होती; पण संध्याकाळी काही भागात वारा सुटला आणि हलक्या सरी पडल्या. त्यामुळे उकाडाही कमी झाला होता. जिल्ह्यातही हलक्या स्वरूपाचा, तर घाटात मोजक्या ठिकाणी जोराचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस घाटात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा