ST Employee Salary Hike Pratap Sarnaik : ‘आजचा निर्णय हा केवळ वेतनवाढीचा नाही, तर विश्वास, सन्मान आणि मानवी संवेदनांचा विजय आहे. एसटीच्या प्रत्येक चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सरकारने केलेला हा योग्य गौरव आहे. कर्मचारी समाधानी असतील, तरच लालपरी अधिक सक्षमपणे, अधिक विश्वास आणि कार्यक्षमतेने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत धावेल’, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
लालपरीची राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा
सरनाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, एसटीच्या सर्व कामगार संघटनांची सोमवारी बैठक घेण्यात आली. गेल्या आठ दशकांपासून लालपरी राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा बजावत आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
Maharashtra Weather: पहिल्याच पावसात रस्ते-रुळांवर पाणी तुंबलं, महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं; मुंबईसह 7 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
कोणकोणत्या भत्त्यात वाढ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय्य अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के, घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून १०-२०-३० टक्के आणि वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरून तीन टक्के केला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून ५,६४९ कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
नेमून दिलेल्या हॉटेलांवर एसटी न थांबल्यास दंड
एसटीच्या भरारी पथकाने महामार्गावरील एसटी महामंडळाने नेमून न दिलेल्या हॉटेलांवर बस उभ्या करणाऱ्या १३१ बसवर कारवाई केली आहे. दोन महिन्यांत केलेल्या या कारवाईतील एसटी बस राज्याच्या विविध भागांतील आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल केले जाणार आहेत.
चालकांवर कारवाईचा इशारा
एसटीचालक महामार्गावर कोणत्याही हॉटेलवर थांबून फक्त स्वतःचाच फायदा पाहत होते. हॉटेल चालकाकडून प्रवाशांची लुटमार करण्यात येत होती. अशा तक्रारी वाढल्यानंतर एसटी प्रशासनाने प्रत्येक मार्गावर अधिकृत हॉटेलची नेमणूक केली. त्यांना प्रवाशांकडून नाश्ता, जेवणासाठीचे दर निश्चित करून दिले; तसेच त्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या करणाऱ्या चालकांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही चालकांकडून फायद्यासाठी परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या केल्या जात आहेत. अशा बसवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे विभागाची सहा पथके कार्यरत आहेत.
