• Mon. Jun 29th, 2026

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, वेतनवाढीस मंजुरी; प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, वेतनवाढीस मंजुरी; प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा

    Good News For ST Employees: उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतेही संकट असो, प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

    एसटी बस कर्मचारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून केली.

    यासंदर्भात अधिक माहिती देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची सोमवारी बैठक घेण्यात आली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. गेल्या आठ दशकांपासून लालपरी राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा बजावत आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत.

    Maharashtra TimesSana Malik : तीन तलाकवरुन गदारोळ, सना मलिक यांच्याकडून कुराणचा उल्लेख, भातखळकर म्हणाले, देश संविधानावर चालतो
    ते पुढे म्हणाले की, महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय्य अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के, घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून १०-२०-३० टक्के आणि वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांना मान्यता देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे ५,६४९ कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

    Maharashtra TimesUniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार का? एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य
    प्रस्तावित ‘चक्काजाम’ मागे
    कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करतानाही संयमाची भूमिका घेतलेल्या सर्व कर्मचारी संघटनांचे सरनाईक यांनी आभार मानले. तसेच, कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत, माजी परिवहनमंत्री अनिल परब, आमदार भाई जगताप, आमदार प्रवीण दरेकर तसेच कृती समितीचे सर्व सदस्य यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना सातत्याने शासनापर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने २९ जून रोजी पुकारलेले ‘चक्काजाम आंदोलन’ स्थगित करण्याची घोषणा केली. हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

    अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांचा परवाना रद्द होणार
    अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या बसचालक आणि मालकांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या वाहतूकदारांवर परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येते. त्यानुसार २०२५-२६मध्ये खासगी प्रवासी बस संवर्गातील ५,७२८ दोषींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ४६१.७८ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. तर, १ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत १,४५४ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७८.१८ लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesOmraje Nimbalkar : मी 100 टक्के निधी खर्च केला! खासदार निधीवरील आरोपांना ओमराजे निंबाळकरांचं सविस्तर उत्तर, म्हणाले, ’18 कोटींमध्ये…’
    असा होणार लाभ
    -महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के
    -घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून १०-२०-३० टक्के
    -वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरून तीन टक्के

    आजचा निर्णय हा केवळ वेतनवाढीचा नाही, तर विश्वास, सन्मान आणि मानवी संवेदनांचा विजय आहे. एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा शासनाने केलेला हा योग्य गौरव आहे. कर्मचारी समाधानी असतील, तरच लालपरी अधिक सक्षमपणे, अधिक विश्वासाने आणि अधिक कार्यक्षमतेने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत धावेल. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा