विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी वातावरण आणखी गरम केलं. शिवसेना संपवण्याचं काम केलं जात आहे, आमचे एक-एक गड संपू लागले आहेत, असं म्हणत सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सत्तारांच्या आरोपांसोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत बंडखोरी झालेली बघायला मिळत आहे. भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली असतानाही अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज दाखल केला. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाच. शिवाय सत्तारांनी तर माध्यमांसमोर येत भाजपवर जाहीर आरोप देखील केले. पण दिवसभर टीका केल्यानंतर रात्री मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. भाजप नेते हरिभाऊ बागडे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत अब्दुल सत्तार यांची भेट झाली. एका कार्यक्रमानिमित्त या तिन्ही नेत्यांची भेट झाली असली तरी सत्तार मात्र चर्चेचा विषय ठरले.