• Fri. Jun 5th, 2026

    १०० टक्के एसटी बसेस ‘इलेक्ट्रिक’ करणार, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवास आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार

    १०० टक्के एसटी बसेस ‘इलेक्ट्रिक’ करणार, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवास आरामदायी आणि  प्रदूषणमुक्त होणार

    MSRTC E-Buses: पर्यावरणपूरक प्रवासासाठी एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हळूहळू एसटीचा पूर्ण ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित केला जाणार आहे. सर्वात पहिल्या टप्प्यात 2029पर्यंत 50 टक्के ई-बसेस दाखल होतील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘विकसित महाराष्ट्र’ धोरणांतर्गत एसटी महामंडळामध्ये २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५पर्यंत ८० टक्के; तर २०४७पर्यंत १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

    मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेससंदर्भात बैठक झाली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपसचिव चेतन निकम आदी या बैठकीस उपस्थित होते.

    Maharashtra TimesPune ST Bus: स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने 23 वर्षीय तरुणीचा मणका फ्रॅक्चर; संवेदनाही हरपली, बसचालकावर गुन्हा

    ७ दिवसांत निरीक्षण होणार

    पर्यावरणपुरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील ७ दिवसांत निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक परिसंस्था तयार करावी. ज्या मार्गाने खासगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा, असे निर्देश मुख्यंत्र्यांनी दिले. राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार १५०० ई-बसेसना बसच्या किंमतीच्या १० टक्के किंवा कमाल २० लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपुरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर ५,१५० ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    एसटी आगारांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने

    एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त महामंडळात यांत्रिक पद्धतीच्या सफाईचा श्रीगणेशा होणार आहे. यासाठी नव्याने यंत्रणा विकत घेण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने मुंबई सेंट्रलसारख्या आगारातील फलाट स्वच्छता अर्ध्या तासाऐवजी आठ ते दहा मिनिटांत पूर्ण होणार आहे. एसटी महामंडळाचा ७८वा वर्धापन दिन प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे सोमवारी पार पडला. यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत ‘अ’ वर्गात बारामती, ‘ब’ वर्गात तिरोडा आणि ‘क’ वर्गात अकोले बसस्थानक प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष
    सुवर्णपदक योजनेतंर्गत १२ आणि लालपरी गौरवरत्न पुरस्काराने ६ कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.

    Maharashtra TimesBhiwandi ST Depot: पाच दशकांहून जुन्या भिवंडी एसटी स्थानकाची अखेर पुनर्बांधणी; इमारत, फलाटांचा विकास, हजारो प्रवाशांना फायदा

    सामान्यपणे आठ ते दहा एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जाते. यासाठी साधारण ३० ते ३५ मिनिटे लागतात. मानवी पद्धतीने स्वच्छता होत असल्याने दिवसातून ती दोनच वेळा केली जाते. त्यामुळे अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारी कमी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने दर चार तासांनी सफाई होणार आहे. आगारांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आता ‘क्रिस्टल’ आणि ‘स्मार्ट सर्व्हिस’ यांच्या संयुक्त उपक्रमाला देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत ही यंत्रसामग्री सर्व बसस्थानकांमध्ये पोहोचेल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा