• Fri. Jun 5th, 2026

    Bandra Talao: दोनशे वर्षांच्या सरोवराला नवं जीवन मिळणार, वांद्रे तलावाचं पुनरुज्जीवन; पुसणार अस्वच्छता आणि दुर्गंधीची ओळख

    Bandra Talao: दोनशे वर्षांच्या सरोवराला नवं जीवन मिळणार, वांद्रे तलावाचं पुनरुज्जीवन; पुसणार अस्वच्छता आणि दुर्गंधीची ओळख

    Bandra Talao Revival: वांद्रेमधील नागरिकांच्या पसंतीच्या वांद्रे तलावच्या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे लवकरच सरोवरासह आजूबाजूच्या परिसराचंही रूप बदलणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    समीक्षा राणे, मुंबई: वांद्र्याच्या मध्यवर्ती भागात वसलेले, सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास जपणारे स्वामी विवेकानंद सरोवर अर्थात वांद्रे पश्चिमेकडील वांद्रे तलाव सध्या एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकेकाळी सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणारे नागरिक, फुललेली कमळे आणि नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव गेल्या काही वर्षांत मात्र गाळ, कचरा आणि दुर्गंधीमुळे आपली ओळख गमावत चालला होता. आता महापालिकेने हाती घेतलेल्या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे या ऐतिहासिक जलाशयाला नवे रूप मिळणार आहे.

    दोन मुख्य टप्प्यात काम पूर्ण करणार

    साडेसात एकर परिसरात पसरलेल्या या तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम २ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून ते दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात तलावातील सुमारे ७५० मेट्रिक टन गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. पाऊस वाढल्यास गाळ उपसण्याच्या कामात अडथळे येण्याची शक्यता असल्याने हे काम पूर्ण पुढील आठ ते १० दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तलावातील पाण्याची पातळी कमी करून गाळ काढल्यानंतर तलावातील सात नैसर्गिक झऱ्यांमधून पुन्हा स्वच्छ पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे तलावाची नैसर्गिक परिसंस्था पूर्ववत होण्यास मदत होईल, असा महापालिकेचा विश्वास आहे. दुसऱ्या टप्प्यात तलाव परिसर सुशोभित केला जाणार आहे. पदपथ, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, प्रकाशयोजना आणि आकर्षक सार्वजनिक जागा तयार करून तलाव परिसराला पुन्हा एकदा नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून ओळख दिली जाणार आहे.

    Maharashtra TimesMumbai News: वांद्रेतील गरीबनगर परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा, अतिक्रमण हटवल्यावरही कोंडी कायम; प्रवाशांची दररोज गैरसोय

    प्लास्टिक, निर्माल्य, घरगुती कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे तलावाचे पाणी दूषित झाले होते. काही भागांत दुर्गंधी इतकी वाढली होती की नागरिकांनी तलावाच्या परिसरात जाणेही कमी केले होते. देखभालीअभावी तसेच, कबुतरांचा वावर वाढल्याने होणाऱ्या अस्वच्छतेमुळे त्याचे सौंदर्यच हरवून गेले होते. ‘गाड्यांमधून उतरून काही जण येथे कबुतरांसाठी दाणे टाकतात. कधीकधी गोणीभर दाणे टाकले जातात. त्यामुळे येथे कबुतरांचा वावर वाढला आहे. ते खाण्यासाठी घुशी, उंदीरही येथे फिरतात, त्यामुळे हा परिसर अधिक अस्वच्छ होत आहे,’ असे एका स्थानिक महिलेने सांगितले.

    स्थानिकांमध्ये उत्सुकता

    तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामामुळे स्थानिकांमध्येही उत्सुकता आहे. ‘लहानपणापासून आम्ही या तलावाकाठी खेळलो, फिरलो. पूर्वी येथील पाणी स्वच्छ होते, परिसरही नितळ दिसायचा. मात्र गेल्या काही वर्षांत कचरा आणि दुर्गंधीमुळे तलावाची ओळखच हरवली होती,’ असे शब्बीर खान सांगतात. फातिमा शेख यांच्या मते, सकाळच्या फेरफटक्यावेळी तलावाकडून येणारा वास असह्य व्हायचा. आता काम पूर्ण झाल्यावर परिसर पुन्हा लोकांनी गजबजलेला पाहायला मिळेल’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, हा केवळ तलाव नाही, तर परिसराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे, असे आरिफ सय्यद म्हणाले. मरियम कुरेशी यांच्या मते, सुशोभीकरणानंतर हा परिसर कुटुंबांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. मुलांना घेऊन निवांत वेळ घालवण्यासाठी अशा जागांची गरज आहे,’ असे त्यांनी सांगितले.

    ‘शहर झपाट्याने बदलत असताना अशा ऐतिहासिक जलस्रोतांचे जतन होणे तितकेच गरजेचे आहे. पुनरुज्जीवनाच्या कामामुळे तलावाचे हरवलेले सौंदर्य परत येईल आणि हा जलवारसा पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्यासही मदत होईल’, असा विश्वास स्थानिक शैलेश पै यांनी व्यक्त केला.

    Maharashtra TimesBandra News: वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर कोंडीमुक्त प्रवास, गरीबनगरमधील कारवाईनंतर रिक्षा-बसचं नियोजन, उन्नत मार्गासाठी प्रस्ताव

    कमळ तलाव ते स्वामी विवेकानंद सरोवर

    आज स्वामी विवेकानंद सरोवर म्हणून ओळखला जाणारा हा तलाव पूर्वी ‘लोटस टँक’ किंवा ‘कमळ तलाव’ म्हणून प्रसिद्ध होता. नवपाडा परिसरातील एका श्रीमंत कोकणी मुस्लिम दानशूर व्यक्तीने त्याची उभारणी केल्याची नोंद आहे. ‘मोठा सरोवर’ म्हणूनही ओळख असलेल्या या जलाशयाला ‘ग्रेड-दोन’ वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. १९९०च्या दशकात येथे पॅडल बोटिंग आणि मत्स्यपालनही होत असे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा