Bandra Railway Station: स्थानकाबाहरील प्रवास कोंडीमुक्त करण्यासाठी पश्चिमेसारखचं पूर्वेकडेही नियोजन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, गरीबनगरमधील मोकळ्या झालेल्या जागेवर उन्नत मार्ग मार्गाचं नियोजन केलं जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशांत मोरे, मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस, रिक्षा आणि अन्य वाहनांच्या वर्दळीमुळे येथील प्रवास कोंडीचा झाला आहे. हा प्रवास कोंडीमुक्त व्हावा आणि प्रवाशांना त्वरित रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पश्चिमेकडील नियोजनाप्रमाणेच वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेलादेखील रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्टँड करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने तयार केला आहे. एच पूर्व वॉर्डने हा प्रस्ताव महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर केला आहे.
पादचाऱ्यांना फायदा होणार
वांद्रे पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर येताच वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), म्हाडा, सरकारी वसाहत, भारतनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा मिळतात. मात्र, मीटर रिक्षा आणि शेअर रिक्षांसाठी स्वतंत्र मार्ग, स्टँड नाही. परिणामी, रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड गोंधळ असतो. वाहनांच्या वर्दळीमुळे रेल्वे स्थानक परिसरात पादचाऱ्यांना वाट काढणेही कठीण होते.
काही रिक्षाचालक मनमानी कारभार करत प्रवाशांची लूट करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही या भागात कारवाई करताना तारांबळ उडते. तर, प्रवाशांनाही रिक्षा सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने हाल होतात. हा गोंधळ टाळता यावा, रिक्षाचालकांना शिस्त लागावी, प्रवाशांनाही रिक्षा त्वरित उपलब्ध व्हावी आणि कोंडीमुक्त प्रवासासाठी मुंबई महापालिकेच्या एच पूर्व वॉर्डकडून रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्टँड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांशीही चर्चा करण्यात आली आहे.
एच पूर्व वॉर्डच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे दहा दिवसांपूर्वीच प्रस्ताव सादर केला आहे. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर पडताच बस स्थानक आहे. त्याच्या काही अंतर पुढे जाताच रिक्षांसाठी तीन मार्गिका आणि स्टँड करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
वांद्रे पश्चिमेला रिक्षांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध केल्याने स्थानकाबाहेरील प्रवास कोंडीमुक्त झाला आहे. तशाच प्रकारचे नियोजन वांद्रे पूर्वेला प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बस आणि रिक्षांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही आणि प्रवाशांना सहजपणे रिक्षा उपलब्ध होतील. या भागातील अतिक्रमणही हटवण्यात आले असून, त्याचाच फायदा घेत या प्रस्तावाला गती दिली जात आहे. महापालिका आयुक्तांनी यावर शिक्कामोर्तब केल्यास पावसाळ्यानंतर या कामाचे नियोजन केले जाणार आहे.
Chembur Station: एकाच ठिकाणी मेट्रो आणि मोनोरेल स्थानक, चेंबूरमधून प्रवास सोपा होणार; ‘इंटरचेंज’मुळे फायदा
दुसऱ्या टप्प्यात उन्नत मार्ग
वांद्रे पूर्वेला गरीबनगर भागातील रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या हटवल्यानंतर या भागात मोकळी जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या एच पूर्व वॉर्डकडून पश्चिम रेल्वेच्या मदतीने गरीबनगर येथून न्यायालयापर्यंत पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा उन्नत मार्ग करण्याचे नियोजन केले जात आहे. या भागात न्यायालय, महावितरण कार्यालय असून पुढे बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. भविष्यात वांद्रे सरकारी वसाहत भागात न्यायालयही होणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेर बरीचशी वर्दळ वाढणार आहे. स्थानकाबाहेरील या कोंडीमुक्त प्रवासासाठी रेल्वेच्या मदतीने उन्नत मार्गाच्या पर्यायाचेही नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा