Thane News: ठाण्यातील १२,२०० कोटी रुपयांच्या रिंग मेट्रो प्रकल्पाला तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवाशांचा विरोध वाढला आहे. प्रकल्प अहवालातील त्रुटी, विद्यमान मेट्रो मार्गांची पुनरावृत्ती, वाहतूक कोंडी आणि हजारो झाडांवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त करत कामे तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे शहरात रिंग रेल्वे मेट्रोच्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. हा मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा असून २६ कि.मी. जमिनीवरून तर ३ कि.मी. जमिनी खालून जाणार आहे. महामेट्रो प्राधिकरणाकडून ठाणे शहरात या प्रकल्पाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाबद्दल सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे संस्थेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नगररचनाकार सुलक्षणा महाजन, पर्यावरणतज्ज्ञ नागेश टेकाळे आणि पर्यावरण कायदेतज्ज्ञ हेमा रमणी शनिवारी ठाण्यात या सविस्तर प्रकल्प अहवालातील तृटींवर आक्षेप घेण्यात आला आहे.
ठाणे अंतर्गत मेट्रो मार्ग मेट्रो चार आणि मेट्रो पाच या प्रकल्पाच्या तीन स्थानकांशी समांतर असून येथे पायाभूत सुविधांची पुनरावृत्ती होऊन यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. एमएमआरडीए आणि महामेट्रो प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे या स्थानकांमधील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सुलक्षणा महाजन यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी टीएमटीचा विस्तार, सायकल ट्रॅक, पदपथांचा विस्तार, उपनगरीय रेल्वेचे एकत्रिकरण आणि पार्किंग व्यवस्थापन करून वाहतुक सुरळीत करण्याची आवश्यकता असल्याचे कायदेतज्ज्ञ हेमा रमणी यांनी सांगितले.
Mumbai Goa Highway Accident: गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर
मेट्रोची रोलर कोस्टल राईड
नऊ मीटर उंचीच्या उन्नत मार्गावर उभारण्यात येणारी ठाणे अंतर्गत मेट्रो अन्य मेट्रो मार्गांना आणि उड्डाणपुलांना ओलांडण्यासाठी सुमारे १६ मीटर पेक्षा उंच पुलावरून न्यावी लागण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ती भुमिगत करण्यात येणार असल्याने प्रचंड चढ उतारांचा सामना करावा लागल्याने ही मेट्रो म्हणजे रोलर कोस्टल राईड प्रमाणे तीव्र चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. अरुंद रस्ते आणि दाट वस्तीतून जाणाऱ्या या प्रकल्पाच्या आरेखनामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक असल्यामुळे याची नियोजित डेटलाईनमध्ये कामे पुर्ण करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा पुर्ण नियोजन नसल्यामुळे यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होणार असल्याची भिती महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.
ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोलमडण्याची भीती
तीन किलोमीटरच्या भूमिगत मार्गासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन करावे लागणार आहे. यामुळे सॅटीस येथील एसटी बसस्थानक, रेल्वे बुकिंग विभाग आणि पादचारी मार्ग बाधित होणार आहेत. आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या या भागातील इमारतींना या प्रकल्पामुळे त्रास होणार असून पावसाळ्यात येथील भुमिगत मार्गामध्ये पाणी साचल्यास पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पर्यावरणावर गंभीर परिणाम
सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये या प्रकल्पामुळे केवळ ६६२ झाडांवर परिणाम होण्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात या मार्गावरील ३ हजार २२४ पेक्षा अधिक झाडे पुनर्रोपणासाठी चिन्हांकिंत करण्यात आल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. येथील झाडे तोडणे, स्थलांतरीत करण्याऐवजी त्याची छाटणी करूनही ही झाडे राखू शकतो, असे मत डॉ. नागेश टेकाळे यांनी व्यक्त केले.
