• Sat. Jun 6th, 2026
    Thane Ring Metro: ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो ठरणार डोकेदुखी? तज्ज्ञांचा आक्षेप, नागरिक आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे धाव

    Thane News: ठाण्यातील १२,२०० कोटी रुपयांच्या रिंग मेट्रो प्रकल्पाला तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवाशांचा विरोध वाढला आहे. प्रकल्प अहवालातील त्रुटी, विद्यमान मेट्रो मार्गांची पुनरावृत्ती, वाहतूक कोंडी आणि हजारो झाडांवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त करत कामे तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकांत सावंत, ठाणे: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी शहरांतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात असून सुमारे १२ हजार २०० कोटी रुपयांच्या खर्चातून उभा राहणाऱ्या या प्रकल्पास नियोजन तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. प्रकल्पाच्या सविस्तर अहवालातील मूलभूत त्रुटी, प्रवासी संख्येचे अवास्तव अंदाज, विद्यमान मेट्रो मार्गांशी होणारी पुनरावृत्ती, पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष आणि नागरिकांना विश्वासात न घेता होणाऱ्या कामांना तात्काळ स्थगिती देण्यासाठी सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट या संस्थेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प वादात सापडला आहे.

    ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे शहरात रिंग रेल्वे मेट्रोच्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. हा मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा असून २६ कि.मी. जमिनीवरून तर ३ कि.मी. जमिनी खालून जाणार आहे. महामेट्रो प्राधिकरणाकडून ठाणे शहरात या प्रकल्पाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाबद्दल सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे संस्थेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नगररचनाकार सुलक्षणा महाजन, पर्यावरणतज्ज्ञ नागेश टेकाळे आणि पर्यावरण कायदेतज्ज्ञ हेमा रमणी शनिवारी ठाण्यात या सविस्तर प्रकल्प अहवालातील तृटींवर आक्षेप घेण्यात आला आहे.

    ठाणे अंतर्गत मेट्रो मार्ग मेट्रो चार आणि मेट्रो पाच या प्रकल्पाच्या तीन स्थानकांशी समांतर असून येथे पायाभूत सुविधांची पुनरावृत्ती होऊन यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. एमएमआरडीए आणि महामेट्रो प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे या स्थानकांमधील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सुलक्षणा महाजन यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी टीएमटीचा विस्तार, सायकल ट्रॅक, पदपथांचा विस्तार, उपनगरीय रेल्वेचे एकत्रिकरण आणि पार्किंग व्यवस्थापन करून वाहतुक सुरळीत करण्याची आवश्यकता असल्याचे कायदेतज्ज्ञ हेमा रमणी यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Goa Highway Accident: गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर

    मेट्रोची रोलर कोस्टल राईड

    नऊ मीटर उंचीच्या उन्नत मार्गावर उभारण्यात येणारी ठाणे अंतर्गत मेट्रो अन्य मेट्रो मार्गांना आणि उड्डाणपुलांना ओलांडण्यासाठी सुमारे १६ मीटर पेक्षा उंच पुलावरून न्यावी लागण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ती भुमिगत करण्यात येणार असल्याने प्रचंड चढ उतारांचा सामना करावा लागल्याने ही मेट्रो म्हणजे रोलर कोस्टल राईड प्रमाणे तीव्र चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. अरुंद रस्ते आणि दाट वस्तीतून जाणाऱ्या या प्रकल्पाच्या आरेखनामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक असल्यामुळे याची नियोजित डेटलाईनमध्ये कामे पुर्ण करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा पुर्ण नियोजन नसल्यामुळे यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होणार असल्याची भिती महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.

    ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोलमडण्याची भीती

    तीन किलोमीटरच्या भूमिगत मार्गासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन करावे लागणार आहे. यामुळे सॅटीस येथील एसटी बसस्थानक, रेल्वे बुकिंग विभाग आणि पादचारी मार्ग बाधित होणार आहेत. आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या या भागातील इमारतींना या प्रकल्पामुळे त्रास होणार असून पावसाळ्यात येथील भुमिगत मार्गामध्ये पाणी साचल्यास पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    पर्यावरणावर गंभीर परिणाम

    सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये या प्रकल्पामुळे केवळ ६६२ झाडांवर परिणाम होण्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात या मार्गावरील ३ हजार २२४ पेक्षा अधिक झाडे पुनर्रोपणासाठी चिन्हांकिंत करण्यात आल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. येथील झाडे तोडणे, स्थलांतरीत करण्याऐवजी त्याची छाटणी करूनही ही झाडे राखू शकतो, असे मत डॉ. नागेश टेकाळे यांनी व्यक्त केले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा