• Thu. Jun 18th, 2026
    Nanded News: कार्यकर्त्याच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून शिंदे गहिवरले, निवडणुकीत विकलेली शेती शिवसैनिकाला मिळवून दिली

    Eknath Shinde, Shrikant Shinde: आर्थिक संकटात सापडलेल्या नांदेडमधील शिवसैनिक माधव जाधव यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा दिलासा दिला. निवडणुकीसाठी शेती विकणाऱ्या सैनिकाला शिंदेंनी मोलाची मदत दिली, ज्याची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड: निवडणुकीसाठी २२ गुंठे शेतजमीन विकली, विजयाचा गुलाल काही लागला नाही. पण, जे होतं ते गमावलं, असं असताना देखील कार्यकर्त्याने पक्षासोबत असलेली निष्ठा काही सोडली नाही. उलट रस्त्यावर येऊन पक्षाचं काम करणे सुरूच ठेवले. ही बाब समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे त्याच्या मदतीला धावून आले आणि निवडणूकीत विकेलेली शेती परत मिळवून दिली. जमीन परत मिळताच त्या कार्यकर्त्याला गहिवरून आले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. असा नेता आता पर्यंत बघितला नाही. ‘साहेब मी कायम तुमच्या ऋणात राहील’, असे म्हणत या कार्यकर्त्यांने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

    कोण आहे हा शिवसैनिक ?

    आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, हा हृदयस्पर्शी प्रसंग कोणासोबत घडला आहे, त्या शिवसैनिकाचे नाव आहे तरी काय? तर त्यांचे नाव आहे, माधव जाधव वडगावकर. शिवसैनिक माधव वडगावकर हे भोकर तालुक्यातील रहिवासी असून शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. अनेक वर्षा पासून पक्षाचे काम करत आहेत. माधव यांना 22 गुंठे जमीन आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यासाठी त्यांनी 22 गुंठे जमीन विकली होती. शेती विकून आलेले पैसे निवडणुकीत खर्च केले, पण त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. शेती विकल्यानंतर माधव वडगावकर हे रस्त्यावर आले. त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब शिवसेनेच्या नेत्यांना समजली, पण त्यांच्याकडून कुठलीच मदत मिळाली नाही.

    शिंदेंनी परत मिळवून दिली जमीन

    असे असताना देखील वडगावकर यांनी पक्षाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. पक्षांच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावायचे. महिन्याभरापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नांदेड दौरा करत पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा निहाय आढावा बैठक घेतली. यावेळी आपल्या एका सामान्य कार्यकर्त्यावर ओढवलेली ही परिस्थिती आणि त्याची पक्षाप्रती असलेली निष्ठा ही बाब त्यांच्या कानावर आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मदतीचा हात पुढे केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी माधव यांना जमीन परत मिळवून दिली. विकलेली शेत जमीन परत मिळताच माधव यांना अश्रू अनावर झाले. चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. सध्या नांदेडसह संपूर्ण राजकीय वर्तुळात शिंदे पिता-पुत्रांच्या या संवेदनशीलतेची आणि सोबतच कार्यकर्त्याच्या निष्ठेची जोरदार चर्चा सुरू आहे.

    Maharashtra TimesPunjab Local Body Elections Result 2026: निवडणुकीपूर्वी 7 खासदार BJPत, तरी AAPची एकतर्फी बाजी! पंजाबमध्ये भाजप भुईसपाट, काँग्रेस चमकली

    ‘श्रीकांत शिंदे यांची पोस्ट’

    दरम्यान, हृदयस्पर्शी प्रसंगानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक भावनिक पोस्ट केली. त्यांच्या डोळ्यांतील वेदना आणि पक्षासाठी केलेला त्याग पाहून मन अस्वस्थ झालं. पक्षासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात अन्याय राहू द्यायचा नाही, ही भावना मनात कायम होती. त्याच क्षणी ठरवलं, माधवजींना त्यांची 22 गुंठे जमीन पुन्हा मिळवून द्यायचीच. त्यानंतर तातडीने प्रयत्न सुरू केले आणि अखेर त्यांची विकलेली शेती पुन्हा त्यांच्याकडे सुपूर्द केली. आज माधवजी भेटायला आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील समाधान आणि त्यांनी व्यक्त केलेले आभार हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. कारण शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करणारी शिवसेना ही फक्त राजकारण नाही तर आपल्या माणसांसाठी जीवापाड उभं राहणारं एक कुटुंब आहे.

    कार्यकर्ते पक्षासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावतात. त्यामुळे त्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, हे कर्तव्यच आहे. एखाद्या शिवसैनिकाच्या आयुष्यात पुन्हा आनंद येताना पाहणं यापेक्षा मोठं समाधान दुसरं असूच शकत नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा