• Tue. Jun 16th, 2026

    मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 26, 2026
    मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    मुंबई, दि. २६ :टीबी मुक्त भारत अभियान‘ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे आज करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

    लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई‘ मोहिमेच्या उद्घाटनाला मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, मार्केट व गार्डन समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉक्टर्स, आशा सेविका आणि महानगरपालिकेचे  अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘टीबी मुक्त मुंबई’ च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

    बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करण्यात आले असून अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    मुंबईला टीबीमुक्त करण्यात आपण यशस्वी झालो, तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल. त्यामुळे मुंबईची प्रतिमा अधिक चांगली होईल. या अभियानाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, रेड क्रॉस सोसायटी, एनसीसी, ‘माय युवा भारत’चे स्वयंसेवक, स्काऊट व गाईड, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांना सहभागी केले जाणार आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    टीबीवर योग्य वेळी उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी शासनाकडून तपासणी व उपचाराच्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी देश टीबी मुक्त होणे आवश्यक असून त्या दृष्टीने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान महत्वाचे आहे. सरकार आणि समाजाने एकत्रित येऊन कार्य केल्यास हमखास यश लाभते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    सुरुवातीला राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड आरोग्य केंद्र येथे क्षयरोग अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचेशी संवाद साधला; तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. या कार्यक्रमात राज्यपालांनी 30 क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. राज्यपालांच्या या निर्णयाबद्दल महापौर रितू तावडे यांनी राज्यपालांना ‘निक्षय मित्र‘ प्रमाणपत्र प्रदान केले.

    राज्यपालांच्या हस्ते भारत पेट्रोलियम, न्यारा एनर्जी, अदाणी फाउंडेशन, मेट्रोपोलीस हेल्थ आदी संस्थांना त्यांच्या क्षयरोग अभियानातील सहभागाबद्दल प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed