Mumbai Beggar turn out Nanded Medical Student Abhay : नांदेडमधील एक मेडिकलचा विद्यार्थी मुंबई पोलिसांना सापडला. त्याच्या आई-वडिलांसह कुटुंब दीड महिन्यापासून त्याचा शोध घेत होतं. मुलाला परत पाहिल्यानंतर कुटुंबाला अश्रू अनावर झाले.
नेमकं प्रकरण काय?
अभय बेळकोने हा हदगांव तालुक्यातील तामसा येथील रहिवासी असून जळगाव येथे होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सुरेश बेळकोने हे वायफना येथील जिल्हा परिषद येथे शिक्षक पदी कार्यरत आहेत, तर एक भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे एमबीबीएस डॉक्टर आहे. अभय हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र मागील काही वर्षापासून तो डिप्रेशनमध्ये गेल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. दीड महिन्यापूर्वी तो कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला. वडील नेहमीप्रमाणे शेताकडे गेले होते.
Mumbai News : मुंबईतील भिकारी निघाला मेडिकलचा विद्यार्थी, मालाड पोलिसांनी नांदेडचा ठावठिकाणा शोधला, ‘अभय’ला पाहताच कुटुंब गदगदलं
रात्रभर तो घरी न परतल्यानं कुटुंब चिंतेत होतं. नातेवाईकांकडे विचारपूस केली. संपूर्ण शहरात शोध देखील घेतला, मात्र त्याचा शोध काही लागला नाही. शेवटी तामसा पोलीस ठाण्यात कुटुंबियानी हरवल्याती तक्रार दाखल केली. सलग दीड महिना कुटुंबाने अभयचा शोध घेतला. मात्र, कोणताही सुगावा न लागल्यानं त्यांनी शेवटी आशा सोडून दिली. फोन देखील बंद येत असल्यानं कुटुंबाची चिंता वाढत गेली आणि आपला मुलगा पुन्हा भेटेल याची आशा त्यांनी सोडून दिली होती. अखेर गुरुवारी 21 मे रोजी मुंबईच्या मालाड पोलिसांचा एक फोन आला आणि दुरावलेला मुलगा कुटुंबाला पुन्हा भेटला. दरम्यान, मुलाला पाहताच कुटुंबातील सदस्यांचा कंठ दाटून आला अन् अश्रू अनावर झाले होते. ‘पोलिसांच्या रुपात आम्हाला देव भेटला’, असं म्हणत बेळकोने यांनी पोलिसांचे आभार मानले.
मुंबई पोलिसांनी दाखवली माणुसकी
भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. याच मोहिमेअंतर्गत मालाड पोलिसांच्या एका पथकाला भिकारी अवस्थेत तरुण आढळून आला. दाढी वाढलेली आणि त्याच्या अंगावर मळकट कपडे होते. पोलिसांनी कुटुंबाबाबत विचारणा केली, सुरुवातीला त्याला बोलता आलं नाही. अनेकवेळा विचारणा केल्यानंतर तेव्हा त्याने नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तामसा पोलिसांशी संपर्क करून कुटुंबाची माहिती घेतली, त्यानंतर अभयच्या वडिलांना फोन करून सदरची माहिती दिली. दरम्यान, यावेळी कोमलसिंग जाधव या पोलीस कर्मचाऱ्याची माणुसकी पाहायला मिळाली. जाधव यांनी तरुणाला आंघोळ घातली नवीन कपडे घातले. शिवाय जेवण देखील दिले.
El Nino: शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट; कृषी विभागाचा ‘वॉर प्लान’ तयार
तिरुपती ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेनं प्रवास
डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारा अभय हा मानसिक रुग्ण होता. दीड महिन्यापूर्वी राहत्या घरून बेपत्ता झाला होता. सुरुवातीला तो नांदेडहून इंदौरला गेला. या प्रवासादरम्यान त्याच्याजवळ असलेली छोटी बॅग आणि मोबाईल चोरीला गेला. प्रवासादरम्यान त्याला काहीच सुचलं नाही. तिरुपती ते कन्याकुमारीपर्यंत त्याने रेल्वेने प्रवास केल्याचं त्याने कुटुंबाला सांगितलं. दरम्यान, खिशात पैसे नसल्यानं त्याला दीड महिने भीक मागण्याची वेळ आली. घरी जायचं होतं, पण काहीच सुधरत नसल्याने अभय भीक मागून दिवस काढत होता. तब्बल दीड महिन्यानंतर पोटच्या लेकराला पुन्हा पाहिल्यानंतर संपूर्ण कुटुंब अक्षरश: गदगदलं.
