• Sat. Jun 6th, 2026
    42 व्या वर्षी घरी पाळणा हलला, पण लेकीच्या जन्मानंतर दोनच महिन्यात आक्रित, गावदेवी मार्केट आगीत पित्याचा करुण अंत

    Gaondevi Market Thane Fire : सागर शिंदे यांना दोन महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग शमवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील ४२ वर्षीय केंद्र अधिकारी सागर शिंदे आणि प्रभाग समिती कार्यालयामध्ये कार्यरत ५५ वर्षीय सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा या आगीत मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सागर शिंदे यांना दोन महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. मात्र शिंदे यांच्या निधनानंतर या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दोन महिन्यांच्या लेकीचं पितृछत्र हरपलं

    ठाण्यातील बाळकुम हायलॅण्ड येथील गृहसंकुलामध्ये शिंदे कुटुंब राहत होते. शिंदे पाचपाखाडी येथील केंद्रामध्ये कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्या पश्चात आई जयश्री, पत्नी माधुरी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. शिंदे यांचे पार्थिव नितीन कंपनी येथील अग्निशमन केंद्रात आणण्यात आले. इथे लोकप्रतिनिधी, अग्निशमन अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.

    महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी शिंदे यांची आई आणि पत्नीचे महापौरांकडून सांत्वन करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीदेखील शिंदे यांना मानवंदना दिली.

    Raj Thackeray : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

    गाडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार

    काळू शंकर गाडेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांचे मूळ गावी गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे येथे नेण्यात आले. गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
    Maharashtra TimesCrime News : विवाहित बॉयफ्रेण्डसाठी सेल्सगर्लची ज्वेलरी शॉपमध्ये चोरी, 1.66 कोटींचे दागिने लंपास, आंघोळ करताना विश्वासघात अन् गेम पालटला

    दुर्लक्ष केल्यामुळेच दुर्घटना

    अतिक्रमणे, मार्केटमधील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रवेशद्वारावर कब्जा, स्थावर मालमत्ता विभागाच्या संगनमताने मार्केटभोवती उभारलेल्या बेकायदा टपऱ्यांमुळे आगीची दुर्घटना घडली, असा आरोप भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. या आगीची माहिती मिळताच वाघुले यांनी अग्निशमन दलाबरोबर संपर्क साधला होता.

    फळे व भाजीपाला विक्रीसाठी असलेल्या या मार्केटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. काही समाजकंटकांकडून दहशतही पसरवली जात होती. प्रवेशद्वाराचा कब्जा बेकायदा फेरीवाल्यांनी घेतला होता. मार्केटच्या दोन बाजूंच्या भिंतीभोवती बेकायदा टपऱ्या टाकल्या गेल्या. या प्रकाराविरोधात सातत्याने महापालिका व स्थावर मालमत्ता विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगीची दुर्घटना घडली, असा आरोप वाघुले यांनी केला.

    Thane Gaondevi Market Fire Sagar Shinde  Maharashtra Times (1)

    मार्केटमधील मूळ विक्रेते अतिक्रमणांमुळे हैराण झाले होते. तसेच बेकायदा विक्रेत्यांकडून मार्केटमध्ये सामान ठेवले जात असल्याच्या तक्रारी होत्या. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ मार्च, २०२६ रोजी वाघुले यांनी तक्रारही केली होती. तसेच आगीचा धोकाही व्यक्त केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मार्केटमध्ये चार बाजूंपैकी दोन बाजू दुकानांमुळे बंद झाल्या. उर्वरित दोन भिंतींवर केवळ छोटी लोखंडी जाळी बसविण्यात आली. त्यामुळे हवा खेळती राहत नव्हती. दोन बाजू बंद असल्यामुळे आग धुमसत राहिली आणि आगीने रौद्र रूप धारण केले होते, असे वाघुले यांनी सांगितले.
    Maharashtra TimesBhakra Canal Tragedy : 26 वर्षांचा शोध संपला, कालव्यात पडलेली व्हॅन अखेर सापडली, लहानग्याचा स्कूल युनिफॉर्म पाहून तीन कुटुंबांच्या अश्रूंचा बांध फुटला

    फेरीवाल्यांना टपऱ्या !

    गावदेवी मार्केटचे पुनर्वसन झाल्यानंतर सर्व १५५ गाळेधारकांना जागा देण्यात आली. असे असताना महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने फेरीवाला पावत्यांच्या आधारावर तीन फेरीवाल्यांना जागा मंजूर केली. त्यानंतर तीन टपऱ्यांना मंजुरी दिली होती. रातोरात दोन टपऱ्या आणण्यात आल्या होत्या. मात्र, वाघुले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा