• Sat. Jun 6th, 2026
    उकाड्यापासून दिलासा मिळणार! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज

    Maharashtra Weather: सध्या महाराष्ट्रात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना अखेर दिलासा मिळणार आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरातही मान्सूनआगमन होईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: कोकणामध्ये मान्सूनपूर्व वातावरणाची निर्मिती झाली असून वातावरणातील आर्द्रताही वाढलेली आहे. कमाल तापमान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उकाडा असह्य झाला आहे. पण कोकण विभागात आता हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी दक्षिण कोकणात तर त्यानंतर सोमवारी उत्तर कोकणात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावासाची शक्यता?

    रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी रविवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. तर सोमवारपासून ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि पालघरमध्ये मात्र वातावरण कोरडे राहील असा अंदाज आहे. कोकण विभागामध्ये शनिवारी बहुतांश केंद्रांवर ३४ ते ३५ अंशांदरम्यान कमाल तापमान नोंदले गेले. कोकण विभागामध्ये कमाल तापमान सध्या सरासरीच्या आसपास आहे. तर किमान तापमान मात्र काही भागांमध्ये सरासरीपेक्षा वाढलेले आहे.Maharashtra TimesEl Nino: इतिहासातील सर्वात तीव्र ‘एल निनो’चा अंदाज; यंदा जूनमध्ये सक्रिय होणार, संपूर्ण मान्सून हंगामावर परिणाम

    उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानाचा पारा चढाच आहे. पुणे, लोहगाव, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील कमाल तापमान हे सरासरीपेक्षा २.५ ते ३ अंशांच्या फरकाने अधिक होते. महाबळेश्वर येथेही कमाल तापमान सरासरीपेक्षा २.७ अंशांनी अधिक नोंदले गेले. मुंबई आणि महाबळेश्वरच्या कमाल तापमानामध्ये शनिवारी फारसा फरक नव्हता. कुलाबा येथे ३४.३ तर सांताक्रूझ येथे ३४.१ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली.

    अंदामान- निकोबारमध्ये मान्सून दाखल

    दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, नैर्ऋत्य आणि आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, संपूर्ण निकोबार बेटे आणि श्री विजयपुरमसह अंदमान बेटांच्या काही भागांमध्ये प्रवेश केला आहे, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शनिवारी सांगितले.

    पुढील तीन-चार दिवसांत आग्नेय अरबी समुद्र, नैर्ऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असेही विभागाने म्हटले आहे. ‘अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचे उर्वरित भाग; तसेच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्येही या काळात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे,’ असे हवामान विभागाने सांगितले.

    Maharashtra TimesMonsoon Update: केरळमध्ये मान्सूनआगमन पाच दिवस आधीच! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

    केरळमध्ये पाच दिवस आधी म्हणजे, २६ मे रोजी मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे, असे विभागाने शुक्रवारी सांगितले होते. केरळमध्ये साधारणपणे एक जून रोजी मान्सूनचे आगमन होते. या दिवसापासून मान्सून हंगामाची सुरुवात होते. दर वर्षी साधारणपणे याच काळात मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल होतो.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा