• Sat. Jun 6th, 2026

    Bhandara Census Protest: जनगणनेला गावकऱ्यांचा विरोध; ओबीसींचा कॉलम नसल्याने खापा गावात बहिष्कार, आल्यापावली परतले कर्मचारी

    Bhandara Census Protest: जनगणनेला गावकऱ्यांचा विरोध; ओबीसींचा कॉलम नसल्याने खापा गावात बहिष्कार, आल्यापावली परतले कर्मचारी

    Bhandara Census Protest: देशात आणि राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना हक्काच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे.

    bhandara census protest(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, भंडारा: जिल्ह्यात शनिवारपासून अधिकृतपणे गृहगणनेला सुरुवात झाली असली, तरी तुमसर तालुक्यातील खापा येथे या प्रक्रियेला पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. २०२६-२७ च्या या जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र कॉलम नसल्याने संतप्त झालेल्या खापा ग्रामस्थांनी जनगणनेवर थेट बहिष्कार टाकला आहे.

    गावात दाखल झालेल्या जनगणना कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत आल्यापावली परत पाठवले. जोपर्यंत जनगणनेच्या अर्जात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केला जात नाही, तोपर्यंत खापा गावात कोणत्याही प्रकारची जनगणना करू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

    Maharashtra TimesManisha Mandhare : नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेली मनिषा मांढरे कोण? मुख्याध्यापिकांकडून महत्त्वाची माहिती
    जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही आणि त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला जात नाही, तोपर्यंत समाजाच्या खऱ्या स्थितीचे आणि संख्येचे मूल्यांकन होऊ शकत नाही. शासनाने ओबीसी समाजाची ही मागणी सातत्याने दुर्लक्षित केल्यामुळेच आता ग्रामीण भागातून हा संताप जनआंदोलनाच्या रूपाने समोर येत आहे. खापा गावातून सुरू झालेला हा विरोध आता संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात पसरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे यांनी दिला आहे.

    जनगणनेला विरोध करण्याच्या या निर्णयाला संपूर्ण खापा गावाने एकमुखी पाठिंबा दिला आहे. गावात जनगणना कर्मचारी दाखल होताच ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व गावकरी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना गावात कोणत्याही प्रकारची नोंदणी करण्यास मज्जाव केला. शासनाने ओबीसी समाजाची गणना स्वतंत्रपणे करावी, ही आमची कायदेशीर आणि न्याय्य मागणी आहे.

    केवळ सर्वसामान्य आणि अनुसूचित जाती-जमातींची वेगळी नोंद करून ओबीसींना ‘इतर’ या वर्गवारीत ढकलणे हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे, अशी भावना उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केली.
    Maharashtra TimesNEET Paper Leak : पुण्यातील महिलेची मदत, विद्यार्थ्यांचे सिक्रेट क्लास; नीट पेपरफुटीतील लातूरच्या प्राध्यापकाची A टू Z स्टोरी
    प्रशासकीय यंत्रणेची धांदल
    गृहगणनेच्या पहिल्याच जनगणनेला असा तीव्र विरोध झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धांदल उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ‘अगोदर ओबीसींचा कॉलम आणा, मगच जनगणनेचे दप्तर उघडा’ असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने तालुक्यातील इतर गावांमध्येही याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे शासन डिजिटल आणि अत्याधुनिक पद्धतीने जनगणना करण्याचे दावे करत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्येच्या एका मोठ्या घटकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख नोंदवण्याचा अधिकार नाकारला जात असल्याने हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा