• Wed. Jun 17th, 2026

    मुसळधार पावसातही लोकल धावती राहणार! रेल्वे स्थानकांवर कामं सुरू; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर होणार

    मुसळधार पावसातही लोकल धावती राहणार! रेल्वे स्थानकांवर कामं सुरू; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर होणार

    Western Railway: पावसाळ्यात पश्चिम रेल्वेतच्या रुळांवर पाणी साचून नेहमी वाहतूक ठप्प होते. गेल्या काही वर्षांत दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावरीत तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पावसाळ्यात रेल्वेरुळ पाण्याखाली जाऊन मुंबई लोकलची होणारी रखडपट्टी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. माटुंगा रोड–माहीम या स्थानकांदरम्यान रुळांची उंची वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील रुळांचा यात समावेश आहे. उंची वाढवण्यात आल्याने रुळांवर पाणी साचून लोकल रखडण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

    दोन वेळा वाहतूक ठप्प

    माटुंगा रोड–माहीम दरम्यानचा भाग हा पावसाळ्यात पाणी साचण्याच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. सप्टेंबर २०१९ आणि ऑगस्ट २०२५मध्येदेखील मुसळधार पावसामुळे संपूर्ण रस्ते आणि रेल्वेरूळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. यंदा आगामी मान्सूनमध्ये पाणी साचण्याच्या घटना रोखण्यासाठी परिसरात नालेसफाईसह पंप उभारणी आणि रुळांची उंची वाढवण्यात येत आहे.

    लोकलची नियमावली

    माटुंगा रोड ते माहीम दरम्यान पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी ड्रेनेज व्यवस्थेची सफाई सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुळांची उंची वाढवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. अप आणि डाऊन धीम्या आणि जलद अशा चार मार्गिकांसह स्टेबलिंग मार्गिका अर्थात लोकल उभ्या करण्याच्या मार्गिकांचीदेखील उंची वाढवण्यात येत आहे. साधारणपणे १५० ते ३०० मिलिमीटरपर्यंत रेल्वेरुळांची उंची वाढवण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत काही ठिकाणी ५० ते १५० मिलिमीटरपर्यंत उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पावसाळा सुरू होण्याच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याचबरोबर फलाटांची उंची वाढवण्याची कामेदेखील सुरू आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    मुसळधार पावसात धावती राहणार

    रुळांची उंची वाढवण्यात आल्याने रेल्वेरूळ पाण्याखाली जाण्याची समस्या कमी होणार आहे. मुसळधार पावसात लोकल धावती राहणार आहे. या कामांसाठी अभियांत्रिकी विभाग, पूल विभाग, ओव्हरहेड वायर विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे.

    कामांची सद्यस्थिती

    “मान्सूनसाठी वर्षभर तयारी सुरू असते. पश्चिम रेल्वे ने केलेल्या कामांमुळे गेल्या दोन वर्षांत पाणी साचून रेल्वेसेवा बंद पडल्याची घटना घडली नाही. यावर्षी पायाभूत सुविधा वाढवण्यासह नालेसफाई आणि रुळांची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यंदाही पावसाळ्यात विनाव्यत्यय लोकल वाहतूक सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा