Thane-Ghodbunder Traffic: ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणाचा आता मार्ग मोकळा झाला आहे. रस्ता अधिक रुंद झाल्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी लागणारा निधी मिरा-भाईंदर महापालिकेला उपलब्ध करून देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली असून, त्यानुसार आता महापालिकेकडून कार्यवाही हाती घेतली जाणार आहे. आवश्यक यापूर्वी भूसंपादन व रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च येत असल्याने महापालिकेने हा रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी
ठाणे-घोडबंदर रस्त्यावरून होणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. त्याच्या तुलनेत रस्ता अरुंद असून अनेक वळणे तसेच, चढ-उतार आहेत. याच मार्गावरून अवजड वाहनांची परराज्यांत ये-जा सुरू असते. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अनेकदा नागरिकांना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागते.Weather Alert: राज्यात उन्हामुळे काहिली! वादळी पावसाचा इशारा तरीही तापमान चढेच राहणार; मराठवाडा, विदर्भ, कोकणात ‘अलर्ट’
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे-घोडबंदर रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फाऊंटन हॉटेल ते गायमुखदरम्यानचा सुमारे सहा किमीचा रस्ता ३० मीटरवरून ६० मीटरपर्यंत रुंद केला जाणार आहे. रस्त्याचे बांधकाम ‘एमएमआरडीए’ मार्फत, तर भूसंपादनाची प्रक्रिया मिरा-भाईंदर महापालिकेमार्फत राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता महापालिकेकडे वर्गही करण्यात आला होता.
काम का रखडले होते?
पालिकेने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात भूसंपादनासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठीही कोट्यवधी रुपयांचा खर्च होत होता. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा खर्च परवडणारा नसल्याचे सांगत फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने भूसंपादन व देखभाल-दुरुस्ती करण्यास नकार देत रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे ठाणे-घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच येत्या काळात हाती घेतल्या जाणाऱ्या घोडबंदर-मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत होती.
Thane News: ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी होणार! नव्या स्थानकाला गती; प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार
ही बाब लक्षात घेऊन दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ‘एमएमआरडीए’ आयुक्तांनी भूसंपादनासाठी लागणारा निधी सरकार किंवा ‘एमएमआरडीए’ मार्फत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच घोडबंदर-मिरा-भाईंदर मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण लवकर होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दिवाळीनंतर कामाला सुरुवात शक्य
मिरा-भाईंदर शहराच्या नव्या विकास आराखड्यात ठाणे-घोडबंदर रस्ता रुंद दर्शवण्यात आला आहे. रुंदीकरणात बाधित होणाऱ्या जमीनमालकांना भूसंपादन प्रक्रिये अंतर्गत पालिका प्रशासनाकडून नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून दिवाळीनंतर रुंदीकरणाचे काम ‘एमएमआरडीए’ला सुरू करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा