• Sat. Jun 6th, 2026

    डोकाडियांच्या मृत्यूचं कारण काय? पोलीस नवीन तंत्र वापरणार, काय असतं मानसिक शवविच्छेदन? त्या रात्री सोबत जेवलेले नातेवाईकही रडारवर

    डोकाडियांच्या मृत्यूचं कारण काय? पोलीस नवीन तंत्र वापरणार, काय असतं मानसिक शवविच्छेदन? त्या रात्री सोबत जेवलेले नातेवाईकही रडारवर

    Pydhonie Watermelon Deaths Case : ​एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्या, अपघात की हत्या होता, हे जेव्हा स्पष्ट होत नाही; तेव्हा तपास यंत्रणा ‘मानसिक शवविच्छेदन’ (Psychological Autopsy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशिष्ट तंत्राचा अवलंब करतात.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : उंदीर मारण्याच्या औषधामुळे पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू झाल्याचं कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झालं आहे. मयत व्यक्तींच्या शरीरातील अवयव (व्हिसेरा) तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये ‘झिंक फॉस्फाइड’ या रसायनाची उपस्थिती आढळली. हे अत्यंत विषारी रसायन असून प्रामुख्याने उंदरांचा खात्मा करण्यासाठी याचा वापर केला जातो. मृत्यूचं कारण स्पष्ट झालं, तरी एक प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे की, हे विष कलिंगडामध्ये मिसळून अन्य कोणी त्यांना दिलं होतं की ते चुकून सेवन केलं गेलं? की कुटुंबप्रमुखाने आधी आपल्या कुटुंबीयांना खायला देऊन त्यानंतर स्वतःचं जीवन संपवलं? पोलीस आता याच दिशेने आपला तपास पुढे नेत आहेत. त्यासाठी मानसिक शवविच्छेदनाचा आधार घेतला जाणार आहे.

    झिंक फॉस्फाइड पोटात जाताच फॉस्फिन वायू तयार

    FSL सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायधुनीतील मृत व्यक्तीच्या शरीरातील अंतर्गत अवयव आणि कलिंगडामध्ये ‘झिंक फॉस्फाइड’चे अंश आढळून आले आहेत. हा पदार्थ प्रामुख्याने पावडरच्या स्वरुपात असतो. शरीरात प्रवेश केल्यावर तो अत्यंत विषारी ‘फॉस्फिन’ वायू निर्माण करतो. कलिंगडामध्येही याच रसायनाचे अंश आढळल्याने हे रसायन फळामध्ये मिसळून त्याचे सेवन करण्यात आले होते, हे स्पष्ट होते. झिंक फॉस्फाइड पोटात जाताच, त्यातून निर्माण होणारा फॉस्फिन वायू थेट फुफ्फुसे आणि शरीरातील इतर अत्यंत महत्त्वाच्या अवयवांवर हल्ला करतो.

    शरीरातील ऑक्सिजन वहन होते विस्कळीत

    अशावेळी रुग्णाचे प्राण वाचवणे अत्यंत कठीण होऊन बसते; कारण शरीरात तयार झालेला हा वायू शरीराबाहेर काढून टाकणे अशक्य असते. जर या पदार्थाचा काही अवशेष पोटात शिल्लक राहिला असेल, तर कदाचित उलट्यांच्या माध्यमातून त्याचा काही भाग बाहेर टाकला जाऊ शकतो; परंतु एकदा का हा वायू शरीरात तयार झाला, की परिस्थिती अत्यंत गंभीर बनते. या वायूच्या दुष्परिणामांमुळे शरीरातील ऑक्सिजन वहन व्यवस्था विस्कळीत होते आणि परिणामी संबंधित व्यक्तीचा मृत्यू ओढवतो.
    Maharashtra TimesSolapur Crime : भावजयीसह तिच्या दोन लेकरांचा जीव घेतला, सोलापुरात ट्रिपल मर्डर, आरोपी दीर पश्चिम बंगालमध्ये सापडला, वहिनीच्या तगाद्यामुळे खून

    हत्या, अपघात की आत्महत्या?

    FSL अहवालाने मृतांच्या शरीरात, तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये ‘झिंक फॉस्फाइड’ (उंदीर मारण्याचे विष) असल्याची पुष्टी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री जेवायला उपस्थित असलेल्या नातेवाईकांची पोलीस आता पुन्हा चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. अन्न किंवा कलिंगडामध्ये कोणी विष मिसळले होते, हे शोधून काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. अब्दुल्ला हा मानसिक तणावाखाली होता का, त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले का, की कुटुंबाचे कोणाशी तरी वैमनस्य होते? हा प्रश्न आहे. पोलीस आता या कुटुंबाचे ‘कॉल रेकॉर्ड्स’, सोशल मीडियावरील हालचाली आणि गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रम यांची बारकाईने तपासणी करण्याची तयारी करत आहेत.

    Bacchu Kadu : अतिक्रमण हटवणारे अधिकारी अफझल खानापेक्षा कमी नाही, बच्चू कडू संतापले

    मानसिक शवविच्छेदनाचा आधार

    एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्या, अपघात की हत्या होता, हे जेव्हा स्पष्ट होत नाही; तेव्हा तपास यंत्रणा (पोलीस किंवा विशेष पथके) ‘मानसिक शवविच्छेदन’ (Psychological Autopsy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशिष्ट तंत्राचा अवलंब करतात. यालाच ‘मानसोपचारविषयक शवविच्छेदन’ (Psychiatric Autopsy) किंवा ‘न्यायवैद्यक मानसिक शवविच्छेदन’ (Forensic Psychological Autopsy) असेही संबोधले जाते. पारंपारिक शवविच्छेदनापेक्षा वेगळे असलेले हे तंत्र, मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी नसून; त्या व्यक्तीच्या ‘मनाची आणि मानसिक स्थितीची’ केली जाणारी एक सखोल चौकशी मानले जाते.

    Pydhonie Watermelon Deaths Case  Maharashtra Times (1)

    ‘मानसिक शवविच्छेदना’द्वारे सूक्ष्म परीक्षण:

    ‘मानसिक शवविच्छेदना’च्या प्रक्रियेत, पोलीस मृत व्यक्तीची वैद्यकीय कागदपत्रे, मानसिक आरोग्याशी संबंधित माहिती, सोशल मीडियावरील हालचाली, WhatsApp आणि Instagram सारख्या मेसेजिंग ॲप्सवरील संभाषणांचे तपशील आणि कॉल डिटेल्स यांचे विश्लेषण करतात; याव्यतिरिक्त, मृत व्यक्तीशी असलेल्या संबंधांचे मूल्यमापन करण्यासाठी ते कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी आणि मित्र यांच्या मुलाखतीही घेतात.
    Maharashtra TimesPune Nasrapur Case : चिमुरडीच्या घशात ​मोजा कोंबल्यामुळे श्वास अडला, पोस्टमार्टममध्ये स्पष्टता, भीमरावचा लैंगिक सक्षमता चाचणी अहवाल कोर्टात सादर

    या चाचणीची सुरुवात कशी झाली:

    या तंत्राचा पाया १९५० च्या दशकात, लॉस एंजेलिस येथील ‘आत्महत्या प्रतिबंध केंद्रा’मध्ये अमेरिकन तज्ज्ञ एडविन एस. श्नाइडमन यांनी रचला. सुरुवातीच्या काळात, अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे ओढवलेला मृत्यू हा आत्महत्येचा परिणाम होता की केवळ एक अपघात, हे निश्चित करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जात असे. कालांतराने, गुंतागुंतीच्या गुन्हेगारी घटनांच्या तपासाव्यतिरिक्त; आत्महत्या संशोधन, गुन्हेगारी तपास, विमा दावे आणि कट-कारस्थानांशी संबंधित प्रकरणांच्या छाननीसाठीही या तंत्राचा वापर केला जाऊ लागला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा