• Sun. Jun 14th, 2026
    उन्हाने अंगाची लाहीलाही होत असताना लोकल प्रवाशांवर ‘शीतल’माया! हार्बर, पश्चिम मार्गावर एसी लोकल फेऱ्या वाढणार

    AC Local Trains: पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमुळे सर्वाधिक महसूल प्राप्त होतो आहे. त्यात वाढत्या उन्हामुळे एसी लोकलची मागणीही वाढली आहे. त्यामुळे हार्बर आणि पश्चिमवर वाढीव लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: तप्त झळांनी नकोसा झालेला लोकलप्रवास आता हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी शांत, शीतल आणि सुखकारक होणार आहे. हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलच्या (एसी) १४ फेऱ्या, तर पश्चिम रेल्वेवर १२ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर उद्या, १ मेपासून या वाढीव लोकलफेऱ्या सुरू होणार आहेत.

    १२ एसी फेऱ्या वाढणार

    उन्हाळ्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीन एसी लोकल दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर १२ एसी फेऱ्यांसह १५ डबा लोकलच्या १७ फेऱ्याही वाढणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच विरार-डहाणूदरम्यान ही वाढीव आसन क्षमता असलेली लोकल धावणार आहे.Maharashtra TimesMumbai Local: पावसाळ्यात मध्य रेल्वेची पुराच्या पाण्यातून सुटका होणार! शीव-कुर्ला स्थानकांवर विशेष लक्ष; पालिकेचं नियोजन काय?

    पश्चिम रेल्वेवर सध्याच्या १२ विनावातानुकूलित लोकल रद्द करून त्या जागी १२ एसी लोकल चालवण्यात येणार आहेत. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत एकूण चार एसी लोकलची भर पडली आहे. यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या १३३वरून १४५ होणार आहे. सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांना वाढीव फेऱ्या मिळणार आहेत. शनिवार व रविवारी ११८ फेऱ्या उपलब्ध होणार असून, यापूर्वी ही संख्या १०६ इतकी होती.

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/वाशी दरम्यान धावणाऱ्या १४ विनावातानुकूलित लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत एकूण दोन फेऱ्यांचा समावेश आहे. हार्बरवरील १४ फेऱ्यांनंतर एकूण फेऱ्यांची संख्या १०८वर पोहोचणार आहे. पश्चिम रेल्वेवर एसीच्या १२४ फेऱ्या आहेत. हार्बरवरील एसी लोकलची रोज सरासरी ४ हजार ४७१ तिकिटांची विक्री होत आहे. तिकीट आणि पासच्या माध्यमातून रोज सरासरी ४० हजार ०१७ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतात.

    वक्तशीरपणावर लक्ष देणे गरजेचे

    हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर एसी फेऱ्या सुरू करताना साध्या लोकलच्या फेऱ्यांच्या वक्तशीरपणावर लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः हार्बरवर एसी लोकलचे दरवाजे उघड-बंद होण्याच्या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे गाड्या विलंबाने धावतात. यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी फेऱ्या वाढवण्यासह साध्या लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

    Maharashtra TimesMumbai-Pune Missing Link: जोखमीच्या वाहनांना ‘मिसिंग लिंक’वर बंदी! मार्गासाठी महत्त्वाचे नियम जाहीर; टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू होणार

    विरार-डहाणू मार्गावर

    प्रथमच १५ डबा लोकल चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या १२ डब्यांच्या १७ लोकल फेऱ्या आता १५ डब्यांच्या लोकलन चालवण्यात येणार आहेत.
    सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत पाच फेऱ्यांचा समावेश आहे. यापैकी आठ फे्या प्रथमच विरार-डहाणू मार्गावर चालवण्यात येणार आहेत. काही कारणांमुळे १५ डब्यांच्या लोकल दोन्ही दिशांनी ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरिन लाइन्स या स्थानकांवर थांबणार नाहीत. या गाड्या दादर स्थानकावर फलाट क्रमांक ४वर दुहेरी थांबा घेतील.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा