Mumbai Concert Tragedy peddler arrested : गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी आयुष साहित्य याला पोलादपूर पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
या प्रकरणी मुंबईतील वनराई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कॉन्सर्टदरम्यान ‘एक्सटसी’ (Ecstasy) या अमली पदार्थाचे वितरण झाल्याचे तपासात समोर आले होते. याच्या अतिसेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, ज्या मुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला होता.
असा रचला सापळा
दरम्यान, मुख्य आरोपी आयुष साहित्य हा मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मुंबई पोलिसांनी पोलादपूर पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलादपूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत महामार्गावर नाकाबंदी केली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपीला अडवण्यात आले आणि त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
Maharashtra Goverment : मंत्रालयात मंत्र्यांसोबत आता एकाच व्यक्तीला प्रवेश, उपस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य, गर्दी नियंत्रणासाठी मोठा निर्णय
तपासात मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता
तपासादरम्यान आयुष साहित्य यानेच कॉन्सर्टमध्ये ‘एक्सटसी’ या अंमली पदार्थाचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी वनराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अटकेमुळे प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून या रॅकेटमधील इतर संबंधितांचीही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, स्वप्नील कदम, तुषार सुतार, सुनील कांजर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, ड्रग्जविरोधातील लढ्यात ही मोठी यशस्वी मोहीम मानली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कन्सर्ट आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षेची कडक अंमलबजावणी करण्याची गरजही अधोरेखित होत आहे.
