• Fri. Aug 7th, 2026

    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार; सावजी मटणावरून आता युवा संघटनेचा आक्रमक इशारा, ‘माफी मागा अन्यथा कोर्टात खेचू’!

    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार; सावजी मटणावरून आता युवा संघटनेचा आक्रमक इशारा, ‘माफी मागा अन्यथा कोर्टात खेचू’!

    नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी भोजनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विदर्भातील सावजी भोजनालय व्यावसायिक आणि हलबा समाज युवा संघटना आक्रमक झाली आहे. सावजी हा केवळ एक व्यवसाय नसून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असून त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची जोड आहे. अशा व्यवसायाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायाशी संबंधित समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे सांगत तुकाराम मुंढे यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सावजी भोजनालय चालक आणि हलबा समाज युवा संघटनेने दिला आहे.

    “सावजी ही विदर्भाची ओळख असून मागील दोन पिढ्यांपासून हलबा समाजातील कुटुंबे हा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत. हा केवळ हॉटेल व्यवसाय नसून समाजाच्या परंपरेशी आणि संस्कृतीशी जोडलेला वारसा आहे. त्यामुळे सावजी नावाबाबत कोणतेही सर्वसाधारण किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करणे योग्य नाही. सध्या सावजी नावाने अनेक हॉटेल असून मसाले बाजारात विकले जातात. मात्र सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सावजी भोजन तयार केले जाते, असे नाही. खरे अस्सल सावजी भोजनालयांमध्ये बाजारातील रेडिमेड मसाले किंवा तयार मिरची पावडरचा वापर केला जात नाही. सावजी मसाले घरातील महिलाच पारंपरिक पद्धतीने तयार करतात. त्यामुळे भेसळीचा प्रश्नच उद्भवत नाही,” असा दावा व्यावसायिकांनी केला.

    “हलबा समाजाव्यतिरिक्त इतर अनेक जण सावजी नावाचा वापर करून हॉटेल व्यवसाय करतात. त्यामुळे जर अन्न व औषध प्रशासनाला अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असेल, तर अशा ठिकाणी तपासणी करावी. संपूर्ण सावजी परंपरेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. खरे सावजी कोण आणि नावाचा गैरवापर कोण करत आहे, याची चौकशी प्रशासनाने करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

    नागपूर आणि विदर्भात येणारे पर्यटक, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या आवडीने सावजी भोजनाचा आस्वाद घेतात. हिवाळी अधिवेशनाच्या काळातही अनेक आमदार आणि मंत्री सावजी भोजनासाठी येतात. अशा परिस्थितीत सावजी भोजनामुळे किती लोकांची तब्येत बिघडली, याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच तुकाराम मुंढे यांनी स्वतः पारंपरिक सावजी भोजनालयात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि सावजी भोजनाचा अनुभव घ्यावा, असे निमंत्रणही संघटनेने दिले आहे.

    दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही दखल न घेतल्यास तुकाराम मुंढे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा सावजी भोजनालय व्यावसायिक आणि हलबा समाज युवा संघटनेने दिला आहे.