• Sat. Jun 6th, 2026
    Pune News : पुणेकरांना दिलासा! कात्रज-कोंढवा ट्रॅफिक जाम कमी होणार; भू-संपादनाला कोट्यवधी मिळाले, रस्ता रुंदीकरणाला वेग, 32 टक्के काम पूर्ण

    पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट असलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता वेग येणार आहे. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

    कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचे ३२ टक्के काम पूर्ण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या कात्रज–कोंढवा मार्गावरील नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला राज्य शासनाने गती दिली असून भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रकल्पाच्या कामांना प्राधान्याने वेग देण्यात येत आहे.

    कात्रज–कोंढवा हा मार्ग शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा असल्याने येथे दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. सध्या या रस्त्यावर ताशी सुमारे १५ हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असून त्यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. बोपदेव घाट आणि दिवे घाटमार्गे येणारी बहुतांश वाहतूक याच मार्गावर अवलंबून असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण ८४ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील हा पहिला टप्पा असून जून २०२६ पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर भू-संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

    पहिला टप्पा अन् निधी

    पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौरस मीटर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. प्रत्यक्ष जागेवर बॉण्ड्री मार्किंग, तसेच झाडांची मोजणी सुरू झाली असून विविध विभागांमध्ये समन्वय साधत ही प्रक्रिया राबवली जात आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती यावर लक्ष ठेवून आहे.Maharashtra TimesBeed Accident : व्यवसायातून घर सावरणार होता पण नियतीला ते मान्य नव्हतं, शिवाई बस-दुचाकीच्या धडकेत एकुलता एक लेक गेला; आई-वडिलांचा आक्रोश

    या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सुमारे ₹१४० कोटी, तर महापालिकेकडून सुमारे ₹३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भू-संपादनासाठी आवश्यक १०० टक्के निधी जमा करण्यात आल्याने कामाला आर्थिक बळ मिळाले आहे.

    प्रकल्पाचे ३२ टक्के काम पूर्ण

    रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिन्या तसेच माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. अंतिम आराखड्यात सायकल ट्रॅक, फूटपाथ, पार्किंग आणि युटिलिटी डक्ट यांचा समावेश असेल. दरम्यान, National Highways Authority of India (NHAI) मार्फत राजस चौक येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित करण्यात येत आहेत. सध्या प्रकल्पाचे सुमारे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने सुरू आहे.

    हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कात्रज–कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा