• Fri. Jun 5th, 2026

    ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 11, 2026
    ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    सातारा, दि. १२: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची व्याप्ती राज्यात वाढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    जिल्हाधिकारी कार्यालय व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे याचा शुभारंभ दरे तालुका महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवन संरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, सातारचे प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    उन्हाळ्यामध्ये धरणाची पाणी पातळी कमी होते. पाणी पातळी कमी झाल्यामुळे धरणातील गाळ काढल्यानंतर पाण्याची क्षमता ही वाढते व गाळाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. यामुळे शेती अधिक सुपीक व कृषी उत्पन्न जास्त देते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहे.

    जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धरणांमधील व तलावांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा व आपली शेत जमीन जमीन सुपीक करून कृषी उत्पन्न वाढवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed