Shaktipeeth Highway Plan: शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा मंजूर झाला असला तरी या मार्गासाठी विरोध कायम आहे. कुठलीही गरज नसताना हा महामार्ग शेतकऱ्यांवर थोपवण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.
शेतकऱ्यांकडून विरोधाची शक्यता
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयात सातारा जिल्ह्यातून हा मार्ग कोठून जाणार याविषयी मात्र स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र, आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही या महामार्गाला विरोध होऊ शकतो. याविषयीचा शासन निर्णय बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला.
Pune News: ‘सिंगल पिलर’वर उभारणार आठ पदरी पूल! नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग; पिंपरी-चिंचवड, चाकणशी थेट जोडणी
नागपूर-गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग म्हणजेच महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या आखणीला फेब्रुवारी २०२४मध्ये मान्यता देण्यात आली होती. या आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेली प्रारंभिक अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यांतील मंजूर आखणीसाठी ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन, उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळाने तपासून सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, या मार्गात बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे, सुधारित प्रस्तावानुसार, हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून, ४० तालुक्यांमधून जात आहे. त्यामुळे २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. महामार्गाची ही सुधारित आखणी अंतिम करण्याचा निर्णय अखेर बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला.
कसा असेल नवा मार्ग?
मूळ मंजूर आखणीपैकी वर्धा, यवतमाळ, बीड व लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मूळ मंजूर आखणीमध्ये सुधारणा करून आणि सातारा जिल्ह्यामधील आखणीचा नव्याने अंतर्भूत करून, महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांद्यापर्यंत (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आधी ८०२.५९२ किलोमीटर लांबीचा असलेल्या मार्ग आणखी लांब होऊन ८५६.७६५ किलोमीटर इतका होणार आहे.
Atal Setu: दररोज 250 रुपयांचा टोल पडतोय भारी! अटल सेतूकडे सर्वसामान्यांची पाठ; 26 महिन्यांत अपेक्षेहून निम्मीच वाहतूक
शेतकऱ्यांचा मार्गाला विरोध
‘कुठलीही गरज अथवा मागणी नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांवर थोपविण्यात येत आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काही तालुक्यांतून जाणारा मार्ग बदलण्यात आला. परंतु, ते होत नाही तोच आता सातारा जिल्ह्याचा समावेश या महामार्गात करण्यात आला असून, नेमका कुठून हा मार्ग जाणार याविषयीची स्पष्टता नाही. राज्य सरकारने याविषयी ठाम निर्णय घेऊन, तो रद्द करण्याचा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
