Maharashtra Rain Alert 1st April: गेल्या काही दिवसांत पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पावासामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. मंगळवारी पावासाने काही काळ विश्रांती घेतली असून, बुधवारपासून येत्या पाच दिवसांपर्यंत पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनधी, मुंबई: भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या पाचदिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजा चमकणे, गारपीट आणि वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिलाआहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, विजेचा कडकडाट ऐकू आल्यास तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाइल फोनचा वापर करू नये. याशिवाय, ग्रामपंचायत, पोलिस आणि आरोग्य विभागामार्फत तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात यावेत. तसेच शाळा, सभागृहे, सार्वजनिक इमारती सुरक्षित आश्रयस्थळ म्हणून खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. तसेच यात्रास्थळे आणि मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने स्थगित करावेत, असे आवाहन प्रशासनाने केल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
मंगळवारी पावसाची विश्रांती
पुणे शहरात सोमवारी सायंकाळी मुसळधार बरसलेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली. जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. पुण्यात दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले होते, वादळी वाराही सुटला होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत आकाश ढगाळ होते.
मंगळवारी पुण्यात दिवसभरात कमाल ३४.७ आणि किमान १९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार असून, दुपारनंतर मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
Atal Setu: दररोज 250 रुपयांचा टोल पडतोय भारी! अटल सेतूकडे सर्वसामान्यांची पाठ; 26 महिन्यांत अपेक्षेहून निम्मीच वाहतूक
मुंबईमध्ये पावसाची शक्यता
दरम्यान, एप्रिलमध्ये मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये आता मान्सूपूर्व पावसाच्या पहिल्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने 1 एप्रिलपासून मुंबई महानगर प्रदेशासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.या भागांत 2 एप्रिल रोजी हलक्या सरींचा पाऊस असण्याची शक्यता आहे
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा