• Mon. Jun 15th, 2026

    मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 31, 2026
    मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान – महासंवाद

    नवी दिल्ली,  दि. ३१ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

    देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले होते.  त्यात मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक  राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना हा सन्मान जाहीर झाला होता. नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये झालेल्या या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी, अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे संचालक अनीश राजन, अकादमीच्या सचिव श्रीमती पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    साहित्यिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे हे समाजाचे दायित्व असल्याचे सांगून श्री. विश्वनाथ प्रसाद तिवारी म्हणाले, की समाजातील या सृजनशील सकारात्मकतेचा गौरव झाला नाही तर समाज मूल्यहीन होऊन नष्ट होईल . त्यामुळे या सृजनाचा गौरव करणे ही अमूर्त स्वरूपातील समाजाचे प्रतिनिधी असलेल्या साहित्य अकादमीसारख्या संस्थांची जबाबदारी आहे. त्यासोबतच तो समाजाचा धर्म म्हणजेच कर्तव्यही आहे. साहित्यिकांच्या साहित्यातून समाजाला प्रेरक मुल्ये मिळत असतात. लेखक हा सदैव जागरूक असतो. त्याचे जीवन वैशिष्ट्यपूर्ण असते कारण तो एकाच जगण्यामरण्यात अनेक जगणे-मरणे अनुभवत असतो. असे सांगून त्यांनी पारतंत्र्याच्या कालखंडात प्रख्यात साहित्यिक भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या साहित्याने एक युग निर्माण केले. त्यातून पुढे आलेल्या स्वदेशी आणि स्वभाषा या दोन्ही मूल्यांची पुढे चळवळ झाली, याचा दाखला दिला.
    अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कारांमागची भूमिका विषद केली . सचिव श्रीमती होळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती कुमुद शर्मा यांनी आभार मानले.

    यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, समीक्षा, आत्मकथा अशा विविध साहित्य प्रकारांतील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्यकृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आले आहे.

    इतर भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते याप्रमाणे  – ( भाषा व लेखक)
    * आसामी- देवब्रत दास
    * बांगला -प्रसून बंद्योपाध्याय
    * बोडो – सहायसुली ब्रह्म
    * डोगरी – खजूर सिंह ठाकुर
    * इंग्रजी – नवतेज सरना
    * गुजराती  – योगेश वैद्य
    * हिंदी -ममता कालिया
    * कन्नड – अमरेश नुगडोगी
    * कश्मीरी – अली शैदा
    * कोकणी – एच एम. पेरनाळ
    * मैथिली – महेन्द्र झा
    * मलयाळम् – एन. प्रभाकरन
    * मणिपुरी – हाउबम नलिनी देवी
    * नेपाली -प्रकाश भट्टराई
    * ओडिया – गिरिजाकुमार बलियारसिंह
    * पंजाबी  – हरजिंदर पाल ‘जिंदर ‘
    * राजस्थानी – जितेंद्र कुमार सोनी
    * संस्कृत – महामहोपाध्याय साधु भद्रेशदास
    * संताली  – सुमित्रा सोरेन ( मरणोत्तर )
    * सिंधी –  भगवान अटलानी
    * तमिळ  – एस. तमिळसेलवन
    * तेलुगु – नंदिनी सिद्धरेड्डी
    * उर्दू – प्रितपाल सिंह बेताब

    0000

    Maharashtra Weather : पावसाची वाट पाहता पाहता महाराष्ट्रात वाढला उष्णतेचा पारा; 17 जिल्ह्यांना अलर्ट
    महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम महत्त्वपूर्ण: उच्च शिक्षणात महिलांनी प्रशासकीय व संशोधन क्षेत्रात पुढे यावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
    ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed