• Mon. Jun 15th, 2026
    Buldhana Unseasonal Rain: अवकाळीने रब्बी मातीमोल! बुलढाण्यातील 201 गावांना फटका; 3802 हेक्टरवरील पिकांची मोठी हानी

    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती: विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न मातीमोल झाले आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील २०१ गावांतील ३ हजार ८०२ हेक्टरवरील पिके या पावसाने उद्‌ध्वस्त झाली आहेत. तसा प्राथमिक अंदाजाचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

    गहू, हभरा, कांदा, कांदा बीज, मका, ज्वारी, भाजीपाला, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा, बाजरी पिके आडवी झाली. तालुकानिहाय विचार करता चिखलीतील १८ गावे, बुलढाणा १४, मोताळा १६, मलकापूर ४२, खामगाव २०, शेगाव दोन, नांदुरा १५, जळगाव-जामोद ४१, संग्रामपूर ११, लोणार १०, देऊळगाव राजा तालुक्यातील १२ गावांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे.

    Rain Alert: मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पंचनामे करण्याची मागणी
    दरम्यान, मोताळा तालुक्यातील तळणी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा तीन एकरातील हरभरा जळून खाक झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. तळणी येथील श्रीनिवास पद्माकर नाफडे यांनी हरभरा पेरला होता. तीन एकरातील हरभरा सोंगून त्याची गंजी घालण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास वादळी पावसात वीज कोसळल्याने हरभऱ्याची गंजी जळाली. यात सुमारे दोन लाखांवर नुकसान झाले आहे.

    अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मेळघाटसह अंजनगाव सुर्जी आणि अचलपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अमरावती शहर, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली तालुक्यातही मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मेळघाटातील काटकुंभ, कोयलारी, बामादेही, राजनिकुंड आणि चुरणी परिसरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस झाला. या पावसासोबत झालेल्या गारपिटीने उभ्या गव्हाच्या पिकाचा अक्षरश: चिखल केला. यंदा पीक चांगले येईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या पावसाने हिरावला आहे. यानिमित्ताने मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    Maharashtra TimesSatara ZP : पोलीस आणि मंत्र्यांची पहिल्यांदाच झटापट, सातारा ZP अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत टोकाचं राजकारण
    पांढरा कांदा संकटात

    अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा भागात १९ मार्च रोजी दुपारी गारपिटीने तडाखा दिला. तालुक्याचा पांढरा कांदा देशभरात प्रसिद्ध आहे, मात्र काढणीला आलेला हा कांदा आता पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी पावसाचे निमित्त साधून दरात मोठी कपात केली आहे. दीड हजार रुपये क्विंटल असलेला कांदा आता साडेआठशे रुपयांवर आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed